आजार रोखण्यात पालिकेला अपयश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आजार रोखण्यात पालिकेला अपयश

Share This
डेंग्यू आजाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच एक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारी नुसार यावर्षी डेंग्यूमुळे देशातील सर्वाधिक ३३ मृत्यू महाराष्ट्र राज्यात झाले असून त्यात मुंबईतील ११ मृत्यूंचा समावेश आहे. मात्र अनेक ठिकाणी डेंग्यू आजाराची तसेच त्याच्या मृत्यूंची अधिकृतरित्या नोंद होण्यात अडचणी येत असल्याने ही संख्या अधिक असण्याची शक्यता असल्याचे मत या अहवालात मांडण्यात आले आहे. 

डेंग्यू प्रमाणेच मुंबई मध्ये मलेरिया या आजाराचा परिणाम जाणवत आहे. मलेरियाचे प्रमाण गेल्या काही वर्षाच्या तुलनेत कमी झाले असले तरी हा आजारही गंभीर आहे. मुंबईत यावर्षी आतापर्यंत मलेरियाचे १८ बळी झाले आहेत. राज्यात मलेरियामुळे ५१ मृत्य झाले असून देशात २५७ जणांचा बळी या आजारामुळे गेला आहे. गेल्यावर्षीच्या ३९१ रुग्णांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 

यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. पावसाच्या अखेरच्या टप्प्यात डेंग्यूचे विषाणूंची वाढ होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात देशात दिल्लीसह, राजस्थान, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. 
गेल्या सहा वर्षांत देशात यावेळी सर्वाधिक ५५,०६३ रुग्ण २८ ऑक्टोबरपर्यंत आढळले, त्यातील ३५८३ डेंग्यू रुग्ण महाराष्ट्र राज्यात आहेत. केरळमध्ये २३, गुजरातमध्ये १५, कर्नाटक व राजस्थामध्ये प्रत्येकी १२ जण डेंग्यूमुळे दगावले असल्याचे अहवालात म्हटले आहे


मुंबईत 
डेंग्यूचे 
२०१० मध्ये ११५ रुग्ण होते त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०११ मध्ये ४१६ रुग्ण होते त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१२ मध्ये १००८ रुग्ण होते त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१३ मध्ये ९२७ रुग्ण होते त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०१४ या वर्षी अद्याप ७५० ते ८०० रुग्ण असून अद्याप ११ जणांचा मृत्यू झाला आहे.या आकडेवारीवरून मुंबईमध्ये मलेरिया नंतर गेल्या काही वर्षात डेंग्यूने थैमान घातले आहे हे समोर येत आहे.  

मुंबई मध्ये डेंग्यूने थैमान घातले असताना मुंबई महानगर पालिकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यूचे कमी रुग्ण मिळाल्याचा दावा करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी गेल्या वर्षी जितक्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे तितकेच मृत्यू या वर्षीही झाले आहेत. डेंग्यू विरोधात मुंबई महानगर पालिकेने मोहीम सुरु केली असली तरी म्हणावे तसे यश आलेले नाही. पालिकेने स्वच्छता ठेवावी असे आवाहन करूनही पालिकेचीच रुग्णालये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याने केइएम सारख्या रुगणालय डेंग्यूचे माहेर घर बनले आहे. 

पालिकेचे आवाहन करूनही स्वच्छता ठेवली जात नसल्याने केईम सारख्या रुग्णालयातील डॉक्टरांनाच उपचारासाठी दाखल करावे लागले आहे. इतकी भयानक स्तिथी सध्या मुंबई शहरात आहे. पालिकेकडून 
डासांचा नायनाट करण्यासाठी वापरले जाणारे नीता पॉल कंपनीचे कीटकनाशक निकृष्ट दर्जाचे असल्याने डासांचा प्रादुर्भाव रोखणे पालिकेला कठीण होत आहे. त्यामुळे मुंबईत डेंग्यूची साथ फोफावली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. पालिकेने ६८ लाख रुपये दंडात्मक कारवाई केलेल्या या कंपनीलाच केमिकल पुरवठ्याचे कंत्राट दिल्याचा गौप्यस्फोटही सत्तेत सहभागी असलेल्या भाजपने केला आहे. 
 

धूर फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पायरॅथ्रॅम एक्स्ट्रॅक्ट-२% या कीटकनाशकाच्या दोन लाख ५६ हजार लिटर पुरवठ्याचे कंत्राट स्थायी समितीने मार्च, २०१३ मध्ये मंजूर केले. २६ कोटी १८ लाख रुपयांच्या या कंत्राटाचे युनिव्हर्सल ऑरगॅनिक पुरवठादार असून नीता पॉल ही उत्पादक कंपनी आहे. केमिकल पुरवठ्याचे हे कंत्राट २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन वर्षांचे आहे. निकृष्ट दर्जाच्या केमिकलमुळे पुणे आणि सुरत महापालिकेने नीता पॉल कंपनीला ब्लॅकलिस्ट केले आहे. 

निकृष्ट दर्जाच्या केमिकलच्या आरोपांमुळे मध्य प्रदेश सरकारच्या डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेसने २०११ मध्ये कंपनीच्या कोलकता येथील युनिटची पाहणी केली. या पाहणीत कंपनी केमिकल उत्पादन करू शकत नसल्याचा शेरा मारला आहे. कंपनीकडे महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य खात्याचा परवाना नसल्याचे तसेच हे केमिकल खरेदी करणे योग्य नसल्याचे मत आरोग्य खात्याने व्यक्त केला असल्याचा दावा भाजपचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे. 

डेंग्यू मलेरिया इत्यादी रोग डासांपासून पसरतात अश्या डासांना मारण्यासाठी जी कीटकनाशक वापरली जात आहेत त्याचा दर्जाच योग्य नसल्याचे समोर आले आहे. या कीटक नाशकांचा डासांवर कोणताही परिणाम होत नसल्याने मुंबईमध्ये डेंग्यू आणि इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई मध्ये आजारांचे प्रमाण वाढत असताना नागरिकांकडून करोडो रुपयांचा कर वसूल करूनही मुंबई मध्ये स्वच्छता राखण्यात आणि नागरिकांना चांगले आरोग्य, सोयी सुविधा देण्यात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून मुंबई महानगर पालिकेला अपयश आले आहे. 

डेंग्यूचे रुग्ण आणि मृत्यू 
वर्ष       रुग्ण    मृत 
2010    115      3 
2011    416      3 
2012   1008     5 
2013    927     11 
2014    794     11


अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages