जवखेडे हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जवखेडे हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा - प्रकाश आंबेडकर

Share This
मुंबई : जवखेडे तिहेरी हत्याकांडाची चौकशी सीबीआयकडून करण्याची जोरदार मागणी शुक्रवारी महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या मोर्चात करण्यात आली. ज्येष्ठ रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सीएसटी येथील आझाद मैदानाकडे निघाला, पण मैदानात सध्या काही कार्यक्रम सुरू असल्यामुळे पोलिसांनी मोर्चेकर्‍यांना भायखळ्यातच रोखून पुढे जाऊ दिले नाही. यामुळे रिपाइं नेत्यांनी राणीच्या बागेजवळील मैदानात ठाण मांडले आणि तेथेच जाहीर सभा घेतली. 
जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, त्यांच्या तपासावर विश्‍वास नाही, अशी टीका सर्वच नेत्यांनी करून तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी एकमुखाने केली. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना, पोलीस आणि सत्ताधार्‍यांच्या सहभागानेच हे हत्याकांड झाल्याचा आरोप केला. 'अंनिस'चे दाभोळकर यांच्या मारेकर्‍यांचा तपास पोलिसांना अजून लागू नये, ही खेदाची आणि शरमेची बाब आहे, असे अँड़ आंबेडकर म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. 

या मोर्चात जवखेडे हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आलेल्या वक्त्यांमध्ये राजेंद्र गवई, आमदार कपिल पाटील, प्रकाश रेड्डी, कनिष्क साबळे, ज. वी. पवार, भीमराव बनसोड, अशोक ढवळे, कामगार नेते मिलिंद रानडे, मुंबई महापालिकेतील नगरसेवक अरुण कांबळे आदींचा समावेश होता. 'यापुढे दलितांवर होणार्‍या अत्याचाराचा, अन्यायाचा कठोर मुकाबला करू,' अशी प्रतिज्ञाही वक्त्यांनी घेतली. सुमारे १५ वक्त्यांनी या वेळी भाषणे केली. 


पोलिसांनी मोर्चेकर्‍यांना सीएसटीला जाऊ न देता भायखळय़ात रोखल्याने, मोर्चामुळे राणीचा बागेसमोरील रस्ता दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला होता. या रस्त्यावर अखंड वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages