रेल्वे रुळांवरील मृत्यू थांबवण्यासाठी १८0 कोटी रुपये खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे रुळांवरील मृत्यू थांबवण्यासाठी १८0 कोटी रुपये खर्च

Share This
मुंबई : रेल्वे रूळ ओलांडताना दरवर्षी तीन हजारपेक्षाही अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. रुळांवरील हे अपघाती मृत्यू थांबवण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) विविध विकासकामांसाठी मागील पाच महिन्यांत १८0 कोटी रुपयांची कंत्राटे मंजूर केली आहेत. मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांसह अकरा स्थानकांत फुटओव्हर ब्रिज, सरकते जिने, रुळांदरम्यान हरित पट्टे तसेच तारांचे कुंपण उभारण्यासाठी ट्रेसपासिंग कंट्रोल प्रोजेक्टअंतर्गत हा निधी खर्च होणार आहे. 

मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना चालू वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत २,६00 प्रवाशांचा मृत्यू झाला. यापैकी ६५ टक्के मृत्यू हे मध्य रेल्वे स्थानकांदरम्यान झाले आहेत. कुर्ला, ठाणे, बोरिवली आणि वसई या स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना सर्वाधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. 'बहुतेक ठिकाणी पायाभरणीसारखी प्राथमिक स्वरूपातील कामे पूर्ण झाली आहेत. हा प्रकल्प मे-जून २0१६ पर्यंत पूर्णत्वास नेण्यात येईल,' असे एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश सक्सेना यांनी सांगितले. 

तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी २७ ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाला सुरुवात केली होती. या प्रकल्पाचे डिझाईन जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि रेल्वे इंडिया टेक्निकल अँण्ड इकॉनॉमिक सर्व्हिसेस यांनी तयार केले आहे. 'अकरा स्थानकांत २५ एस्कलेटर आणि आठ सरकते जिने उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांना रूळ ओलांडण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच स्थानकांतील गर्दी कमी करण्यासाठी १३ फुटओव्हर ब्रिज उभारण्यात येणार आहेत,' असे एमआरव्हीसीच्या एका अधिकार्‍याने सांगितले. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी एमआरव्हीसीने जागतिक बँकेकडून ४३0 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज घेण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages