मुंबई / प्रतिनिधी - मुंबई उपनगरात लोकलच्या मार्गावर १५ ते २१ नोव्हेंबर या आठवडाभराच्या कालावधीत तब्बल ७८ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला असून ६८ प्रवासी जखमी झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील फाटके डोकेदुखी ठरत असून याठिकाणी होणा-या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मृत्यूची संख्या पाहता कळवा आणि दिवा येथील रेल्वे फाटक याकरिता कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे फाटकांमुळे प्रवासी रुळ ओलांडत असल्याने अपघातांमध्ये वाढ होते. लोकलच्या अपघातांच्या या मालिकेत ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत सर्वाधित १४ प्रवाशांच्या अपघाती मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरात सीएसटी-२, दादर-४, कुर्ला-८, ठाणे-१४, डोंबिवली-३, कल्याण-९, वडाळा रोड-५, कर्जत-५, वाशी-३, पनवेल-१, चर्चगेट-१, मुंबई सेंट्रल-४, वांद्रे-३, अंधेरी-५, बोरिवली-४, वसई रोड-६, पालघर-१ अश्या ७८ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे.

No comments:
Post a Comment