मुंबई: ७ नोव्हेंबर
अगोदरच राज्यातील सर्वसामान्य जनता डाळ आणि कांद्यासारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीमुळे त्रस्त असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर एसी बसेसच्या तिकीट दरात राज्य सरकारने केलेली दरवाढ म्हणजे खाजगी बस व्यावसायिकांचे उखळ पांढरे करण्याचा उद्योग असल्याची टीका माजी परिवहन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या परिवहन विभागाने कोणताही विचार न करता केलेल्या हंगामी तिकीट दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या वतीने मुंबई सेंट्रल बस स्थानकावर शनिवारी जोरदार आंदोलन केले. माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक धात्रक यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी स्थानकाबाहेर जाणाऱ्या एसटी बसेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरल्या होत्या.आंदोलनामागील भुमिकेबाबत बोलताना धात्रक म्हणाले की,एसटी नफ्यात चालवणे हे सरकारचे उद्दीष्ट असू नये, तर सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देण्याला त्यांचे प्राधान्य असायला हवे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतात. अशा वेळीच जर एसटीच्या दरात वाढ केली तर त्याचा सर्वसामान्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही हंगामी भाववाढ तत्काळ रद्द करण्याची मागणी धात्रक यांनी केली.


No comments:
Post a Comment