मुंबईतला कचरा उचलण्याचे काम ठप्प करा - वाल्मीकी समाज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतला कचरा उचलण्याचे काम ठप्प करा - वाल्मीकी समाज

Share This


मुंबई / प्रतिनिधी - मुंबईची घाण साफ करण्याचे काम वाल्मीकी समाज करतो, पण या समाजाला जात प्रमाणपत्रे, हक्काची घरे आणि आरोग्याच्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. समाजाच्या मागण्यांकडे सरकार आणि पालिका डोळे झाक करत आहे. प्रलंबीत मागण्या मान्य होण्यासाठी मुंबईतील कचरा उचलण्याचे काम ठप्प करा, असे आवाहन वाल्मीकी समाजाच्या नेत्यांनी मुंबईतील सफाई कामगारांना केले. 

रविवारी (दि. १९) वांद्रे येथील कोलगेट मैदानावर मुंबई काँग्रेस सफाई कामगार सेलच्या वतीने वाल्मीकी समाजाच्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याला राज्यभरातून वाल्मीकी समाजाचे हजारो लोक उपस्थीत होते. 

वाल्मीकी समाज मुंबईत नसेल तर मायानगरीचा नरक होईल. म्हणूनच कचरा उचलण्याचे काम काही दिवस ठप्प करा, असा सल्ला माजी रेल्वे राज्यमंत्री आणि वाल्मीकी समाजाचे राष्ट्रीय नेते भक्त चरणदास यांनी उपस्थितांना दिला. 

मुंबईतील वाल्मीकी समाज वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाच्या मागे उभा राहिला असून या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढेही काँग्रेस पक्ष गंभीरतेने काम करेल, अशी ग्वाही मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

मुंबईत वाल्मीकी समाजाची २० लाख संख्या आहे, प्रत्येक रेल्वे स्टेशनशेजारी वाल्मीकी वस्ती आहे. मात्र या समाजाला जातीची प्रमाणपत्रे, हक्काची घरे आणि आरोग्याच्या काहीच सुविधा मिळालेल्या नाहीत, असे मुंबई काँग्रेस सफाई कामगार सेलचे अध्यक्ष राजेशभाई रिडलान यांनी सांगितले. वाल्मीकी समाजाच्या युवकांनी आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी जागे व्हायला पाहिजे, असे काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले.

मेळाव्याला आमदार भाई जगताप, मुंबई काँग्रेस महिला अध्यक्षा शितल म्हात्रे, वैशाला गाला, गणेश कांबळे, एस. बी. जाधव, मंगल बागडे, गोपालभाई रिडलान आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिकेत विजयी झालेल्या नगरसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

वाल्मीकी चषकाचे दशकगेली दहा वर्षे राजेशभाई रिडलान हे राज्यातील वाल्मीकी समाजाच्या युवकांसाठी क्रिकेट सामने आयोजित करतात. यंदा ३४ संघ सहभागी झाले होते. पुना इलेव्हन संघाने एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक जिंकले. वाल्मीकीनगर (अ‍े) दुसरा तर विलेपार्ले संघाने तिसरा क्रमांक पटकावला. १२ चेंडूत अर्धशतक करणाऱ्या आनंद चव्हाण या खेळाडूस मॅन आॅफ द मॅच चा पुरस्कार देण्यात आला.
शिवसेनेला सहाय्य नाहीमुंबई महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष तटस्थ राहिले, काँग्रेसने मात्र पराभव दिसत असतानाही निवडणूक लढवली. कारण काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या संदर्भात कदापी न्यूट्रल राहू शकत नाही, असे सांगत यापुढेही शिवसेनेशी काँग्रेस कदापी हातमिळवणी करणार नाही, अशी ग्वाही मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages