- महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 April 2017

- महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविणार - मुख्यमंत्री

मुंबई - महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे विविध आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तसेच सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य सेवा दर्जेदार करण्यावर भर दिला आहे. या सहाय्याने सर्वसामान्यांपर्यंत मोफत आरोग्य सेवा पोचविण्याचे काम आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आजपासून निदानपूर्व चाचणी उपक्रमास (प्री डायग्नोस्टिक) सुरूवात होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा चाचण्यांवर होणारा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. या उपक्रमासाठी केंद्र शासनाची एचएलएल लाईफ केअर लिमिटेड ही संस्था मदत करणार आहे.
            
यापुढील काळात आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्लाऊड कॉम्प्युटिंगद्वारे युनिफाईड प्लॅटफॉर्मवर आरोग्य विषयक सगळे अहवाल एकत्र ठेवण्यात येतील. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी आपले अहवाल प्राप्त होणार असून चांगल्या सेवेसाठी त्याचा उपयोग होणार आहे. तसेच राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ही रिअल टाईम बेसिसवर रुग्णालयांशी जोडले जात आहेत. त्यातून ग्रामीण भागातील रुग्णांनाही तज्ज्ञांचा सल्ला मिळण्यास मदत होत आहे. येत्या काळात पैसे नाहीत म्हणून राज्यातील कोणत्याही नागरिकांना आरोग्य सेवा नाकारली जाणार नाही, याची काळजी राज्य शासन घेत असल्याचेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.
            
आज उद्घाटन झालेल्या इंद्रधनुष्य व प्री डायग्नोस्टिक सेंटर या उपक्रमाद्वारे मानसिक व शारिरिक दृष्ट्या सुदृढ महाराष्ट्र तयार करण्याचे काम राज्य शासन करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            
आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ‘चला बोलू या.. नैराश्य टाळू या या उपक्रमाच्या माध्यमातून जीवनातील नैराश्य घालविण्यसाठी मदत होणार आहे. सध्या समाजात मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढत आहे. त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. राज्य शासनाने या मानसिक आजारावरील औषध पुरवठ्यासाठी पुढाकार घ्यावा. राज्यात चार मनोरुग्णालये असून ती इंग्रजकालीन इमारतीत आहेत. ही रुग्णालये चैतन्याच्या वास्तू व्हाव्यात, तेथील वातावरण प्रसन्न रहावे, यासाठी त्याचे आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष निधी देण्यात यावा.
            
राज्यात आजपासून प्री डायग्नोस्टिक सेंटरची सुरूवात झाली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने ही सेंटर सुरू होणार आहेत. आजारपणाचे निदान करम्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या चाचण्या या सेंटरमध्ये करण्यात येणार आहेत. तसेच 31 जिल्ह्यामध्ये सिटीस्कॅन प्रकल्प हाती घेण्यात आला असून टेलिमेडिसिनच्या माध्यमातून अहवाल व उपचार करण्यात येणार आहेत, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.            
            
आरोग्य विभागाच्या आशा वर्करच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांमध्ये कौन्सिलिंग कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना याद्वारे सल्ले देण्यात येणार असून त्यातून आत्महत्त्या कमी करण्याचा प्रयत्न आहे,असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले. डॉ. विजय सतबीर सिंग यांनी यावेळी प्रास्ताविकात आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

निदानपूर्व चाचणी केंद्रांचे वैशिष्ट्य - 
- राज्यातील 1811 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 490 रुग्णालयांमध्ये मोफत चाचण्या होणार
- एकूण 72 चाचण्या होणार
- बाह्य रुग्ण विभागातील ६ कोटी, ४० लाख आंतररुग्ण, आणि ८ लाख बाळांना या चाचण्यांचा लाभ होणार
इंद्रधनुष्य उपक्रम
- लसीकरणातून वंचित राहिलेल्या ० ते २ वर्षे वयाची बालके व गरोदर महिलांसाठी उपयुक्त
- या उपक्रमाद्वारे या बालकांना व महिलांना लसीकरण करण्यात येणार
- राज्यातील ९ जिल्हे व १७ महानगरपालिकांमध्ये मोहिम राबविणार
- 1 लाख बालके व 50 हजार मातांना याचा लाभ होणार


जीवनातील नैराश्य टाळण्यासाठी परस्परातील संवाद अधिक दृढ व्हावेतसध्या संवादाचे माध्यम हे डिजिटल झाले आहे. त्यामुळे व्यक्त होण्याची ताकद वाढली आहे. परंतु,लोकांना आवडणाऱ्या गोष्टींच व्यक्त होत असल्यामुळे मनातील गोष्टी मनातच दाबून टाकल्या जात आहेत. यामुळे डिजिटल युगात नैराश्य टाळण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच पारंपरिक व परस्परातील संवाद अधिक सुदृढ करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज जीवनशैलीमुळे आयुष्यात नैराश्य वाढत आहे. विशेषतः तरुण व शालेय विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त पसरत आहे. आरोग्य सेवेपुढे हे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. पूर्वी परिवार, समाज हा सपोर्ट सिस्टीम होता. लोकांच्या सुख व दुःखात ते आधार म्हणून सोबत होते. मात्र, आता छोटे कुटुंब व एकटेपणामुळे नैराश्य वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही बोलायला कोणी मिळत नाही, म्हणून ते पोलीसांच्या 100 या क्रमांकावर दूरध्वनी करत असल्याचे आढळले आहे.

मुलांना संरक्षण देण्याच्या नावाखाली आपण त्यांच्यातील मानसिक प्रतिकार शक्ती कमी करत आहोत. मुलांमध्ये रडणे, भांडणे, जिद्द, असूया या भावना कमी होत आहे. त्यामुळे ही मुले स्पर्धेच्या जगात गेल्यानंतर त्यांना नैराश्यामुळे ग्रासले जाते व त्यातून आत्महत्यांसारखे प्रकार घडत आहे. नैराश्य टाळण्यासाठी व मानसिक आजारावर आधुनिक चिकित्सेबरोबरच पारंपरिक चिकित्सेवर मोठा भर देण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad