महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणे काळाची गरज - आनंदराज आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 April 2017

महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणे काळाची गरज - आनंदराज आंबेडकर

मुंबई : शिवाजी महाराजांनी रयतेला प्राधान्य दिले, बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार देऊन समानता दिली, महात्मा फुलेंनी समाजसेवेचा वारसा दिला अशा महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच काळाची गरज असल्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि आंबेडकर चळवळीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केले. म्हाडा कर्मचारी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळेस म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे, व्याख्याते अमोल मिटकरी, म्हाडा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे नेण्याऐवजी आपण धार्मिक कार्याला अधिक महत्त्व दिले आहे. संभाजी राजेंच्या मृत्यूचे प्रतीक म्हणून साजरा करण्यात येणारा पाडवा हा केवळ महाराष्ट्रातच पाहायला मिळाला. देशभरात इतरत्र कुठेही पाडवा साजरा केला जात नाही, अशी खंतही आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली. तर व्याख्याते अमोल मिटकरी यांनी महापुरुषांचे महत्त्व महाराष्ट्राला कमी असल्याचे स्पष्ट केले.

शिवाजी महाराजांनी राजेशाही असताना लोकशाही राबवली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेबांनी शिक्षण घेत विद्वत्ता संपादन केली, महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा पुण्यात स्थापन करूनही त्याचे महत्त्व जाणून न घेता महापुरुषांचे विचार दुर्लक्षित होत असल्याची शोकांतिका मिटकरी यांनी व्यक्त केली. महापुरुषांची संयुक्त जयंती करणे ही गरज असल्याचे सांगत म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी जयंती समिती व कर्मचारी संघटनेचे कौतुक केले.

Post Bottom Ad