मुंबई, दि. 30 : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच शिक्षणातील गळती व नापासांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.
राज्य मंत्री मंडळ निर्णयाची माहिती एका पत्रकार परिषदेत देताना तावडे यांनी सांगितले की,समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थी शिकला पाहीजे. याकरीता अनेक योजना शासनामार्फत राबविण्यात येतात, तरीही अनेक विद्यार्थी काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहील्याचे निदर्शनास येत आहे. त्यामूळेच सरकारने महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला. प्रौढ कामगार, गृहीणी, या सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच जीवनाला उपयुक्त असे व्यवसायभिमुख शिक्षण या मंडळाच्या मार्फत मिळू शकणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतर्गत चालणार आहे. परंतू मुक्त विद्यालय मंडळाचा अभ्यासक्रम हा माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमित अभ्यासक्रमापेक्षा वेगळा असेल त्याची विशेष योजना, व्याप्ती, उद्दिष्टे,मूल्यमापन योजना या सर्व बाबी मुक्त विद्यालय मंडळाशी सुसंगत राहतील. तसेच या मंडळामार्फत कौशल्य संपादीत करुन स्वत:च्या व्यवसायात उपयोजन करण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी विविध विषयांचे अभ्यासक्रम तयार केले जातील, असे सांगतानाच तावडे म्हणाले की, या मंडळांतर्गत मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि संस्कृत आदी विषयांसह अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान कौशल्य विकास, बेकरी उत्पादन, स्क्रीन प्रिंटींग,माहिती तंत्रज्ञान, सहकार आदी विषयांचाही समावेश असेल. शिक्षण आयुक्त या मंडळाचे अध्यक्ष असतील. तर शिक्षण विभागाचे अन्य संचालक या मंडळावर सदस्य असतील. विद्यापीठाचे प्रतिनिधी तसेच तंत्र व शिक्षण विभागाचे संचालकही या मंडळावर सदस्य असतील, असेही तावडे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन झाले तरी एकही रात्रशाळा बंद होणार नाही. जे विद्यार्थी रात्र शाळांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहेत, त्यांचे शिक्षण पूढेही सुरु राहील. त्यामुळे रात्रशाळा भविष्यामध्ये बंद होतील अशी भिती कोणी बाळगू नये, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.