मुंबई, दि. 30 : औषध विक्रेत्यांनी पुकारलेला एकदिवशीय संप तातडीने मागे घ्यावा. ऑनलाईन औषध विक्री तसेच इतर मागण्यांबाबत केंद्राशी चर्चा करणार असल्याचे अन्न, औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
बापट म्हणाले की, औषधी द्रव्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील55 हजार दुकानांपैकी निम्मे दुकाने चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी बृहन्मुंबईतील1500, कोकण विभाग 1300, पुणे-500, नागपूर-200, औरंगाबाद-500, नाशिक-100,अमरावती 200 ते 300 औषधी दुकाने चालू आहेत. या संपाला अल्प प्रतिसाद असून सामान्य माणसाला औषधाची उपलब्धता करुन देण्यात येत आहे.
ऑनलाईन औषध विक्री हा विषय देश किंवा राज्य पातळी पुरता मर्यादीत नसून तो आंतरराष्ट्रीय आहे. ऑनलाईन विक्रीबाबत काय व्यवस्था करता येईल याचा विचार केंद्र शासनाने केला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील कायदे केंद्र सरकारशी संबंधीत आहेत. ऑनलाईन विक्री संदर्भात डॉक्टरांचे प्रिसक्रीस्पशन असले पाहिजे. यासाठी एक वर्षापूर्वी डॉ.हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली देशव्यापी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने अहवाल तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचेही बापट यांनी सांगितले.
केंद्र सरकारचा निर्णय होण्याच्या अगोदरच असा संप होणे योग्य वाटत नाही. केंद्रिय मंत्री व सचिव यांच्याशी याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.