मुंबई - येत्या २६ मे २०१७ रोजी भाजपा सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. हे सरकार बेरोजगारी, महागाई, पेट्रोल दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. या सरकारने सामान्य जनतेची लुट केलेली आहे. या संदर्भात मुंबई काँग्रेसतर्फे शुक्रवार, २६ मे रोजी या भाजपा सरकार विरोधात मुंबईभर आंदोलन करणार आहोत,अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की भाजपा सरकारने ४०० करोडचा तूर डाळ घोटाळा केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय करावे ते कळत नाही आहे. ते या विषयावर स्पष्टीकरण देऊ शकत नाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले होते की तूर डाळचे उत्पादन करा, सरकार सगळी डाळ विकत घेईल. त्यानुसार शेतकऱ्यांनी तूर डाळचे उत्पादन केले. लाखो टन डाळीचे उत्पादन झाले. पण सरकार शेतकऱ्यांची डाळ विकत घेत नाही आहे. ४०० करोडची डाळ व्यापार्यांनीच शेतकरी बनून विकत घेतलेली आहे. मुख्यमंत्रीचे व्यापाऱ्यांशी लागेबांधे आहेत. म्हणून मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत नाही आहेत. हा खूप मोठा डाळ घोटाळा आहे.
संजय निरुपम पुढे म्हणाले कि, मुंबई नागपूर हायवे हा देखील एक खूप मोठा रस्ते घोटाळा आहे. हा रस्ता तयार करताना अनेक शेतकऱ्यांना भाजपा सरकार देशोधडीला लावणार आहेत. अनेक शेतकरी आयुष्यातून उठणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील ७ कंत्राटदारांसाठी हा रस्ता करण्याचा घाट घालण्यात येत आहे. दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंतचे सर्व भाजपा नेते या घोटाळ्यात सामील आहेत. हा रस्ता तयार होण्यासाठी २७००० हजार करोड रुपये लागणार आहेत. हा एक खूप मोठा रस्ते घोटाळा आहे.
महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अशोक चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्य शासनाचा खर्च प्रचंड गतीने वाढतोय,मात्र आर्थिक नियोजन अजिबात नाही त्यामुळे कर वाढविण्याचा सपाटा भाजपा सरकारने लावला आहे. सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सरकारने यापूर्वी सरकारने दुष्काळ जाहीर न करता पेट्रोलवर ६ रुपये अधिभार लावला आहे, तर आता ५ रुपये १५ दिवसात अधिभार लावला असा ११ रुपये अधिभार आता पेट्रोलवर आहे. देशात सगळ्यात महाग पेट्रोल आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. १४ हजार कोटींची महसूली तुट मागील अधिवेशनात होती, तरी सरकारने खर्चावर कपात नाही, देशभर पेट्रोलचे दर कमी झाले असताना राज्यात वाढले आहेत. या पेट्रोल दरवावाढीविरोधात आम्ही आठवडाभरात महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मुंबई, ठाणे नवी मुंबईत उड्डाणपूलासाठी पेट्रोलवर दोन रुपये अधिभार लावला. टोल वसुली संपली तरी हा अधिभार सुरू आहे. सरकार उधळपट्टी करते. शिवस्मारक जाहीरातीवर १८ कोटी खर्च केले.आमचा शिवस्मारकाला विरोध नाही पण जाहीरातीवर एवढा खर्च का केला पाहिजे असा आमचा सवाल आहे. आमच्यासंघर्ष यात्रेनंतर आता सरकार संवाद यात्रा काढणार आहे म्हणजे या सरकारचा संवाद शेतक-यांबरोबर नव्हता आणि संवाद कोण साधणार तर शेतक-यांना साला म्हणणारे रावसाहेब दानवे साधणार, हि खरच हास्यास्पद गोष्ट आहे. तसेच मुद्रांक शुल्कामध्ये केलेली वाढ हि जनतेसाठी अन्यायकारक आहे. आधीच बांधकाम क्षेत्र अडचणीत आहे, त्यात मुंद्रांक शुल्कमध्ये वाढ करणे हे अन्यायकारक आहे. ही वाढ सामान्य माणसावर अन्याय करणारी आहे.
ते पुढे म्हणाले की केंद्र सरकारने उडाण योजना जाहीर केली, यात राज्यातील शहरे जोडण्यासाठी दोन शहरांचा समावेश तर महाराष्ट्र - गुजरात जोडण्यासाठी सहा उड्डाणे. हि योजना गुजरातसाठीच आहे का ? असा आमचा सवाल आहे.