वसई, पनवेल, पडघा, उरणवरून खडीची वाहतूक -
मुंबई - खडी अभावी मुंबई्तील स्त्यांची रखडलेली कामे येत्या 31 मे च्या आत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे. पालिकेला वसई, पनवेल, पडघा व उरणवरून जास्त दराने खडी विकत घ्यावी लागते आहे. खडीची वाहतूक सुरू झाली असली वाढलेले दर व त्यासंबंधित इतर बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ जातो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ठप्प असलेली कामे कमी वेळात कशी पूर्ण करणार हा पेच प्रशासनासमोर आहे. मुंबई उपनगरांत मुंबई महापालिकेने पावसापूर्वीची 558 रस्त्यांची कामे सुरु केली आहे. मात्र ठाणे जिल्हयातील दगडखाणी बंद झाल्याने रस्त्याची कामे रखडली आहेत. आतापर्यंत अवघ्या सुमारे 114 रस्त्यांची कामे पूर्ण झाली. उर्वरित रस्त्यांवर खडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण सुरू असतानाच वसई, पनवेल, पडघा ते उरणवरून जास्त दराने खडी आणण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. खडी मिळू लागल्याने रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी रस्ते विभागाची धावपळ सुरू झाली असली मोठ्या प्रमाणात कामे रखडलेली असल्याने पुढील 10 ते 12 दिवसांत पूर्ण करणे अशक्य आहे. कारण खडीचे दर, वाहतूक आदी बाबी पूर्ण कराव्या लागत असल्याने वेळ जात असल्याची स्थिती आहे. खडीचे वाढलेले दर व कंत्राटात जम बसवावा लागत असल्याने खडीच्या वाहतुकीला उशीर होतो आहे. पण तरीही खडी मिळू लागल्याने रस्ते कामांना वेग आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असताना खोदलेल्या रस्त्यांची कामे पडून असल्याने मुंबईकर हैराण आहेत. ठप्प झालेला खडीचा पुरवठा हे रस्त्यांची काम थांबण्यामागचं महत्वाचं कारण आहे, असे म्हटले जाते आहे. सध्या जागोजागी जेसिबी, डंपर आणि बॅरिकेटस् उभे आहेत. काही ठिकाणी रस्ते बांधण्यासाठीची ही सगळी सामग्री खड़ी अभावी नुसतीच उभी आहे. उर्वरित रस्ते दुरुस्तीसाठी खडी कोण देणार यावरुनच राजकारण सुरु आहे. दरम्यान रस्ते दुरुस्तीसाठी शेकडो ठिकाणी खोदून ठेवलेले खड्डे, अपूर्ण रस्ते यातली पसरणाऱ्या धुळीच्या त्रासाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जातो आहे.