मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या कार्यरत असणाऱ्या पालिकेतील सात अधिकाऱ्यांनी तत्कालीन उप प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्याच्या पदोन्नतीस अडथळा आणण्यासाठी तसेच पालिका परिपत्रकापासून वंचित ठेवण्यासाठी संगनमताने कट करून विविध रजिस्टरमध्ये खाडाखोड केली. पालिकेची तसेच स्थायी समितीची दिशाभूल केल्याप्रकरणी नायायालयाने या अधिकाऱ्यांविरोधात वरळी पोलीसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
तत्कालीन मनपा सुरक्षा अधिकारी काळे यांच्या पदोन्नतीत अडथळा आणण्यासाठी व पालिका परिपत्रकाप्रमाणे आर्थिक फायदा मिळू नये म्हणून तात्कालीन सुरक्षा अधिकारी अरुण विर, श्रीकृष्ण कुलकर्णी, उपप्रमुख सुरक्षा अधिकारी चंद्रकांत जाधव, प्रशांत संखे, प्रकाश साळुंखे, चंद्रकांत भाऊ जाधव यांनी संगनमताने पदाचा गैरवापर करीत सरकारी नोंद वहीमध्ये खाडाखोड, ओव्हररायटिंग करून वरीष्ठांची दिशाभूल केली. तसेच स्थायी समितीत ३० जानेवारी २०१३ रोजी आणलेल्या ठरवात चुकीची माहिती सादर करून स्थायी समितीचीही फसवणूक केली. सदर प्रकार तक्रारदार उप प्रमुख सुरक्षा अधिकारी काळे यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला, तसेच सदर प्रकार हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे वरळी पोलिस ठाण्यात १७ जानेवारी २०१४ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र आरोपींनी पोलिसांशी संगनमत करून गैरसमजुतीतून तक्रारदाराने तक्रार केली असल्याचा चुकीचा अहवाल न्यायालयात देत सदर प्रकरण दफ्तरी दाखल करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. मात्र तक्रारदार काळे यांनी स्वतः वस्तुस्थिती न्यायालायच्या निदर्शनास आणल्यावर वरळी पोलीस अधिकारी टेलवेकर व उप पोलिस निरीक्षक बिरांगे यांनी या प्रकरणी योग्य तपास न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. काळे यांनी आपली बाजू मांडताना सर्व कागदपत्रे व पुरावे सादर करून नोंद वहीमधील झालेली खाडाखोड, ओव्हररायटिंग तसेच ओव्हररायटिंगवर कागदाची पट्टी लावून वरिष्ठांची केलेली दिशाभूल न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे कोर्टाने "सी" समरी रद्द केल्याचे आदेश दिले. काळे यांनी मांडलेले मुद्दे व कागदपत्रांची शहानिशा करून न्यायालयाने काळे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे सांगत पालिकेच्या संबंधित सात अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यास पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व दोषी कर्मचाऱ्यांना समन्स पाठवण्यात आल्याचे समजते.