सौर कृषी वाहिनीद्वारेच शेतकऱ्यांना वीज - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सौर कृषी वाहिनीद्वारेच शेतकऱ्यांना वीज - मुख्यमंत्री

Share This

अहमदनगर: दि. 4 Nov 2017 - 
राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांसाठी देण्यात येणारी वीज सौर फिडरद्वारेच देण्याची शासनाची योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध होण्यासोबतच शासनाच्या पैशांची बचत होण्याचा दुहेरी उद्देश साध्य होईल. राज्याच्या या पथदर्शी प्रकल्पाचे देशातल्या अन्य राज्यांनी अनुकरण करत सौर कृषी फिडर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ग्रामरक्षक दलाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सरपंचांचा मेळावा आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे भूमिपूजन राळेगणसिद्धी येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डीले, विजय औटी, बाबुराव पाचरणे, भाऊसाहेब कांबळे, सभापती राहुल झावरे, सरपंच रोहिणी गाजरे, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव, वल्सा नायर सिंग, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संचालक संजीवकुमार, जिल्हाधिकारी अभय महाजन व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हा ऐतिहासिक दिवस आहे. ग्रामविकास आणि लोकसहभागाचा विचार ज्या राळेगणसिद्धीतून संपूर्ण देशात रुजला त्याच ठिकाणी देशातील पहिल्याच सौर फिडरचे भूमिपूजन होत आहे. या गावात दोन महत्वपूर्ण योजनांचा शुभारंभ होत आहे. ग्रामरक्षक दलाची स्थापना व त्यासाठी कायदा करण्याची भूमिका अण्णांनी मांडली होती. त्यानुसार या कायद्याला मूर्त स्वरूप देण्यात आले. अण्णांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्यांचा समावेश यात केला आहे. या कायद्यामुळे गावागावातील अवैध दारूचे संकट टळणार आहे. अवैध दारू उत्पादन व विक्रीस या कायद्याने आळा बसणार आहे. या कायद्याच्या अमंलबजावणीतून एक आदर्श गाव तयार होऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सौर कृषी फिडर योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होईल. शेतकऱ्यांना दिवस १० ते १२ तास हमखास वीज मिळण्याची खात्री या योजनेतून देता येणार आहे. याशिवाय शासनाने जलसंधारणात अनेक कामे केली आहेत. अण्णांच्या कामातून प्रेरणा घेऊनच हे काम शक्य झाले. विहिरींसोबतच पाणलोट पुनःर्भरणाकडे जाण्याचे काम राज्याने केले आहे. विविध योजना राज्याने यशस्वीपणे राबवल्या असून परिवर्तन होत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages