
मुंबई । प्रतिनिधी 21 Nov 2017 -
जुहू वर्सोवा लिंक रोडवरील ५० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये खतनिर्मितीला चालना मिळणार आहे. आमदार अमित साटम यांच्या निधीतून आणि स्थानिक नगरसेवक रोहन राठोड यांच्या पुढाकाराने या सोसायट्यामध्ये ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी ५० कंपोस्टिंग ड्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेडून शून्य कचरा अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार येत्या जानेवारीपासून पालिका ओला कचरा घेणे बंद करणार आहे. २० हजार चौरस मीटर आणि त्यापेक्षा मोठ्या जागेवर बांधकाम असलेल्या गृहनिर्माण सोसायट्याना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःला लावावी लागणार आहे. स्वयंपाक गृहातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये भाज्यांचा टाकाऊ भाग, शिळे अन्न आदी बाबी असतील. हा ओला कचरा या ड्रम मध्ये टाकून दिवसातून ३ वेळा ते फिरवायचे आहे. २१ ते ३० दिवसामध्ये त्या पासून खतनिर्मिती होणार आहे. शून्य कचरा निर्मितीसाठी आमदार अमित साटम यांनी ५० कंपोस्टिंग टमरेल उपलब्ध करून दिल्यामुळे त्या रहिवाशांना कचरा पासून खत मिळेल. ते खत परिसरातील झाडांसाठी वापरता येईल. जास्त खत झाल्यास त्याची विक्री करून पैसेही मिळवता येतील असे नगरसेवक रोहन राठोड यांनी सांगितले.