मुंबई - अनिल अंबानी समूहातील रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आर्थिक डबघाईला आली आहे. अनिल अंबानी समूह आर्थिकदृष्टय़ा संकटात असून मार्च २०१७ अखेर समूहातील विविध कंपन्यांवर एकूण सव्वा लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे आपले विविध व्यवसाय विकून कर्जातून मुक्त होण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार कर्जात डुबलेली हि कंपनी आता गुजरातमधील प्रख्यात अदानी समूह विकत घेणार आहे. रिलायन्स एनर्जीने वीजग्राहकांकडून वसूल केलेली विद्युत शुल्क आणि वीजकराची १४५२ कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारकडे जमा न करता थकवली असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा मुंबई उपनगरासाठीचा वीजनिर्मिती, वीजपारेषण आणि वीजवितरणाचा व्यवसाय गुजरातमधील प्रख्यात अदानी समूह विकत घेणार आहे, असे गुरुवारी जाहीर करण्यात आले. या समूहातील अदानी ट्रान्स्मिशन लिमिटेड कंपनी त्यासाठी तब्बल १३,२५१ कोटी रुपये रिलायन्सला देणार आहे. मार्च २०१८ पर्यंत हा व्यवहार पूर्ण होऊन एप्रिल २०१८ पासून अदानी ताबा घेईल. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या अखत्यारीतील डहाणूचा ५०० मेगावॉटचा वीजप्रकल्प, वीजपारेषण यंत्रणा आणि मुंबईतील वीजवितरण व्यवसाय असा एकात्मिक वीजव्यवसाय विकण्यासाठी उभय समूहांत बोलणी सुरू होती. मुंबई उपनगरात रिलायन्सचे सुमारे तीस लाख वीजग्राहक असून सरासरी वीजमागणी १८०० मेगावॉट आहे. वीजवितरणातून वर्षांला सरासरी ७५०० कोटी रुपयांचा महसूल कंपनीला मिळतो. रिलायन्सने गुंतवलेल्या भागभांडवलपोटीचे ५५० कोटी रुपयही अदानी समूह रिलायन्सला देईल. याशिवाय वीजदरवाढीसारख्या महसुली विषयावरील सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या अर्जाची सुनावणी विविध नियामक संस्थांकडे सुरू आहे. ते मंजूर झाल्यावर सर्व पाच हजार कोटी रुपये रिलायन्सकडे येतील. अशा रितीने या व्यवहारातून रिलायन्सला एकूण १८ हजार ८०० कोटी रुपये मिळणार आहेत.