मुंबई । प्रतिनिधी - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईतील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून त्यांची मते व प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एका खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. हि संस्था नागरिकांमध्ये ऍप वापराबाबत जनजागृती करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईमधील नागरिकांची स्वच्छता विषयक परिस्थितीबाबत नागरिकांची मते व प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी महापालिकेद्वारे लवकरच सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान पालिकेने नेमलेल्या संस्थेचे प्रतिनिधी मुंबईकर नागरिकांना भेटून स्वच्छतेबद्दल नागरिकांची मते व प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. तसेच स्वच्छता विषय तक्रार मोबाईल ऍप वर कशी नोंदवावी याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या निराकरणासाठी महापालिकेच्या वरळी हब मध्ये २४ तास व आठवड्याचे सातही दिवस नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत "फिट व स्ट्रीट" सर्वेक्षणासाठी गया स्मार्ट सिटीज या संस्थेची तर स्वच्छतेबाबतच्या नामांकनासाठी युनिटेक संस्थेची निवड करण्यात आली असल्याचे सिंघल यांनी सांगितले. फिट व स्ट्रीट सर्वेक्षणादरम्यान नागरिकांचे मते, अपेक्षाआणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी २५ प्रतिनिधी मुंबईमध्ये नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पालिकेचे मोबाईल ऍप कसे वापरावे, मोबाईल ऍपवर फोटो काढून कसे पाठवावे याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. मोबाईल ऍपवर पाठविले जाणाऱ्या तक्रारी अपलोड केल्यास स्वयंचलित पद्धतीने केंद्र सरकारच्या सर्व्हरवर नोंदवली जाणार आहे. या तक्रारीचे निवारण १२ तासात केले जाईल असे सिंघल यांनी सांगितले.