मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिका व राज्य सरकारच्या जमिनी भाडेतत्वावर (लिजवर) दिल्या जातात. या लिजवर दिलेल्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असते. या लिजधारकांना पालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत. या जमिनींचा भाडेकरार संपला आहे. मात्र नव्याने करार करायचा असल्यास आधी अतिक्रमण काढा नंतरच नुतनीकरण करू अशी समज पालिका प्रशासनाने या लिजधारकांना दिली आहे.
मुंबईतील 160 मालमत्तांपैकी 102 मालमत्तांचा करार संपला आहे. या मालमत्तांचे लीज नुतनीकरण अद्याप 10 ते 12 वर्ष झालेले नाही. लीज नुतनीकरण किंवा या मालमत्तांचा ताबाही प्रशासनाला अद्याप घेता आलेला नाही. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी परिपत्रक काढून नियमानुसार लीज नुतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत पालिकेला कळवले. मात्र अनेक लिजवर अतिक्रमण झाल्याची शक्यता असल्याने पालिकेने करार संपलेल्या 102 जमनींची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरु केली. यात 34 जमिनींवर अतिक्रमण असल्याचे समोर आले. त्यामुळे अतिक्रमण काढल्याशिवाय अशा लीजचे नुतनीकरण करता येणार नसल्याने पालिकेने आधी अतिक्रमण काढा नंतरच नुतनीकरण करण्याबाबत नोटिसाद्वारे कळवले आहे. तपासणीमध्ये तब्बल 34 मालमत्तांवर अतिक्रमण आढळल्याने यातील 66 मालमत्तांचेच नुतनीकरण होणार आहे. त्यामुळे अतिक्रमण झालेल्या 34 जमिनींचे अतिक्रमण काढल्यानंतरच नव्या धोरणानुसारच नुतनीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत नवीन धोरण पालिका सभागृहात मंजुरीसाठी येणार आहे. त्यानुसार अतिक्रमण काढल्या नंतरच 34 मालमत्तांचे नुतनीकरण केले जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.