मुंबई । प्रतिनिधी - मुंबईमधील बेकायदेशीर धार्मिक स्थळे पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर महापालिकने आपल्या हद्दीतील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आता मध्य रेल्वेही आपल्या परिसरातील 166 अवैध धार्मिक स्थळे पाडणार आहे.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या मार्गावरील रुळालगत अनेक अनधिकृत धार्मिक स्थळे उभारण्यात आली आहेत. या अनधिकृत धार्मिक स्थळांची संख्या 166 आहे. उच्च न्यायालयाने मुंबईत बांधलेली सर्व अनधिकृत धार्मिकस्थळे पाडण्याचे आदेश राज्य सरकार आणि महानगरपालिकेला दिले आहेत. याच अनुषंगाने रेल्वेच्या हद्दीतील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. न्यायालयाने याबाबत आक्षेप आणि विनंती करण्यासाठी काही कालावधी दिला असून त्यानंतर कारवाई केली जाणार आहे. मध्य रेल्वेवरील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य घेतले जाणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील सीएसटीएम, भायखळा, कुर्ला, मानखुर्द, कल्याण, पनवेल, परेल, जीटीबी, आणि ठाणे येथील मंदिरे, चर्च, मशिदी आणि गुरुद्वारा पाडली जाणार आहेत.