नालेसफाई योग्य होत नसल्याने शहरात रोगराई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2018

नालेसफाई योग्य होत नसल्याने शहरात रोगराई


स्थायी समितीत नागरसेवकांचा आरोप -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत पर्जन्य वाहिन्या व मलनिःसारण वाहिन्यांची सफाई झालेली नाही. ठिकठिकाणी गटारे तुंबल्याने रोगराई पसरली आहे. नालेसफाईच्या कामांचा बोजवारा उडाला आहे यामुळे शहरात रोगराई पसरली असून याला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समितीत करण्यात आला. यावेळी पावसाळ्यानंतरची नालेसफाई कामे त्वरित मार्गी लावण्याची मागणी समितीत केली. दरम्यान, स्थायी समितीने निर्देश दिले असताना कामे का होत नाहीत. तात्काळ अधिक मनुष्यबळ वापरुन सफाई कामे करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी देले.

मुंबईतील नाल्यांची पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के आणि पावसाळ्यानंतर २० टक्के सफाई केली जाते. नाल्यांच्या सफाईसाठी कोट्यावधींची तरतूद करण्यात येते. कोट्यावधी खर्च करूनही कंत्राटदाराकडून नाल्यांची सफाई होत नाही. प्रतिक्षानगरमधील पर्जन्यवाहिनीची सफाई कामे मागील दोन महिन्यांपासून रखडली आहेत. प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा सुरु आहे. स्थायी समितीने पाहणी करुन तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देखील दिले. मात्र, अद्याप ही कामे प्रलंबित आहे. कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी केला. नाले तुंबल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरत आहेत. सफाईकामे होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. प्रशासन याला कारणीभूत असल्याचा आरोप केला. तसेच सर्वपक्षीय सदस्यांनी विभागातील नालेसफाई कामांचा पाढा वाचला. प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर यावेळी सडकून टीका केली. पर्जन्य विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सफाईकामे रखडली आहेत. कंत्राटदार आणि प्रशासनाच्या निष्क्रीय कारभारामुळे नागरिकांच्या रोषाला स्थानिक नगरसेवकांना समोरे जावे लागते. त्यामुळे शिल्लक राहिलेली २० टक्के कामे त्वरित मार्गी लावा, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली. हे काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. त्याबाबत फाईल तयार केली असून ती अतिरिक्त आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली आहे, असे सांगत पर्जन्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी बाजू मारण्याचा प्रयत्न केला. सातमकर यांनी त्यावर हरकत घेत अधिकारी दिशाभूल करत असल्याचे सांगत प्रशासनाची कोंडी केली. आयुक्त अजोय मेहता दर महिन्याला आढावा बैठक घेत असतात. विविध विषयांवर यावेळी चर्चा होते. नालेसफाईच्या शिल्लक राहिलेल्या २० टक्के कामांबाबतही अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे मुदतीत कामे होतील, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त अाबासाहेब जऱ्हाड यांनी दिली. तसेच स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS