भीमा कोरेगांव हिंसाचारामागचे हात शिवसैनिक तोडल्याशिवाय राहणार नाहीत - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 January 2018

भीमा कोरेगांव हिंसाचारामागचे हात शिवसैनिक तोडल्याशिवाय राहणार नाहीत - उद्धव ठाकरे


मुंबई - भीमा कोरेगांवची घटना मन विषण्ण करणारी असून या हिंसाचारामागे असणारे अदृश्य हात जेव्हा सापडतील, तेव्हा ते हात तोडल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाहीत, असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

वरळीतील कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांची संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत अनेकांना टार्गेट केलं. पंतप्रधान परदेशातच असतात. बाहेरचे नेते आले की त्यांना अहमदाबादमध्ये नेतात, असं म्हणत उद्धव यांनी पंतप्रधानांच्या अहमदाबादमधील पतंगबाजीवर सडकून टीका केली. अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, श्रीनगरच्या लाल चौकात नेऊन तिरंगा फडकवला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिमान वाटला असता. केवळ 56 इंचाची छाती असून उपयोग नाही, तर त्या छातीमध्ये शौर्यही असणं अधिक महत्वाचं असतं अशी जहरी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. नौदलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचाही उद्धव यांनी खरपूस समाचार घेतला. कानडी भाषेचा अनादर नाही, तर कानडी अत्याचाराला आमचा विरोध आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पाटील याचं कर्नाटकाबाबतची वक्तव्यही चीड आणणारं असल्याचं स्पष्ट केलं. कन्नडी गौरव गीत गाणारे महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उद्धव यांच्या निशाण्यावर राहिले. कानडी भाषेचा अनादर नाही, तर कानडी अत्याचाराला आमचा विरोध आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पाटील याचं कर्नाटकाबाबतची वक्तव्यही चीड आणणारं असल्याचं स्पष्ट केलं.

आतापर्यंत आम्ही फक्त ऐकतच आलो आहे की, एक मुंडकं कापलं तर आम्ही दहा कापू, एक गोळी मारली तर दहा गोळ्या मारू… कसल्या लिमलेटच्या? नुसतं घुसू… घुसू… सुरू आहे. त्यापेक्षा एकदाच काय तो हल्ला करा आणि पाकिस्तानला कायमचा नेस्तनाबूत करा, असं आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलं. थापा मारून सत्तेत आलेलं भाजप सरकार आजही थापाच मारत असून जनतेला भुलवत आहे. सध्या थापा मारण्याचीच लाट देशात आहे. तेव्हा थापा मारण्याची ही लाट बंद करण्यासाठी देशात थापाबंदी करा. जशी गोहत्याबंदी केली, तशी थापाबंदी करा. कारण गाय मारणं जसं पाप आहे, तसंच थापा मारणं देखील पाप आहे. त्यामुळे थापा मारणं हा गुन्हा ठरवून थापा मारणाऱ्यांना तुरूंगात पाठवा, असंही उद्धव यावेळी म्हणाले. ‘आदित्यला शिवसैनिकांनी नेतेपदी बढती दिली. तुम्ही याला घराणेशाही म्हणा किंवा नका म्हणू. पण ठाकरे घराण्याला जनतेची सेवा करण्याची परंपरा लाभली आहे. आमच्या घरातील पुढची पिढी मी तुमच्या सेवेत देत आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

सेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरेंची निवड -
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा मंगळवारी सकाळी वरळी येथील वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात झाली. यावेळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. नेतेपदाची सूत्रे आदित्य यांच्याकडे अधिकृतरित्या सोपवण्यात आल्यावर कार्यकर्त्यांनी सभागृहात एकच जल्लोष केला.

शिवसेनेची नवी कार्यकारिणी -
या बैठकीत शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा नेतेपदी पाच नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. यामध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे एकूण 13 नेते असतील -
मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, संजय राऊत, रामदास कदम, गजानन कीर्तीकर, सुभाष देसाई
नवीन नियुक्ती - आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, अनंत गीते

शिवसेना सचिव - मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण.

प्रवक्ते - अरविंद सावंत, निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब

Post Bottom Ad

JPN NEWS