पालिकेच्या चुकीमुळे किंवा झाड पडून मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या चुकीमुळे किंवा झाड पडून मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई

Share This

पालिका सभागृहात प्रस्ताव मंजूर -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत चेंबूर येथे झाड पडून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच पालिकेच्या चुकीमुळे आणि दुर्लक्षामुळे अनेक दुर्घटना होतात. अशा दुर्घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो तर कधी जखमी व्हावे लागते. अशा घटना घडल्यावर एखादी व्यक्ती मृत झाल्यावर महापालिकेकडून तुटपुंजी मदत केली जाते. या मदतीच्या रकमेत वाढ करून दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका, एम पूर्वच्या प्रभाग समिती अध्यक्षा समृद्धी काते व भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या दोन्ही ठरावाच्या सूचना पालिका सभागृहाने मंजूर केल्या असल्याने पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर आर्थिक मदतीत वाढ केली जाणार आहे.

मुंबईच्या चेंबूर येथील कांचननाथ या मॉर्निंग वॉकवरून घरी परतत असताना त्यांच्या डोक्यावर नारळाचे झाड पडून त्यात त्यांचा मृत्यू झाला. कांचननाथ यांचे प्रकरण ताजे असतानाच चेंबूर विभागातच कामावर जाण्यासाठी बेस्ट बसची वाट बघत बसलेल्या शारदा घोडेस्वार यांच्या डोक्यावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला. घोडेस्वार या घरातील एकट्या कमावत्या व्यक्ती होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना व्याजावर पैसे घेऊन अंतिमसंस्कार करावे लागले होते. या दुर्घटनांनंतर झाडे पडून मृत्यू पडणाऱ्यांच्या नातेवाईकांना पालिकेकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ कारण्याची मागणी केली जात होती. या अनुषंगाने समृद्धी काते व प्रकाश गंगाधरे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. तसेच प्रकाश गंगाधरे यांनी कोणत्याही प्रकारची दुर्घटना पालिकेच्या चुकीमुळे झाल्यास त्यांनाही ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.

मुंबई हवामानाच्या बदलामुळे झाडे उन्मळून पडल्याने दुर्घटना घडतात. धोकादायक अवस्थेतील झाडे तोडण्यासाठी कंत्राटदारांकडून दिलेल्या वेळेत झाडे तोडली जात नाहीत. परिणामी अशा दुर्घटनेमध्ये अंगावर झाड पडून आपत्कालीन मृत्यू ओढवतो किंवा एखादा व्यक्ती जखमी होतो. यामुळे त्यांच्या कुटुंबातील आर्थिक कणा मोडून जातो. पालिकेकडून जखमी झालेल्याना आर्थिक मदत दिली जात नाही. तर मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून १ लाख रुपये इतकी रक्कम देण्यात येते. पालिकेकडून दिली जाणारी रक्कम तुटपुंजी आहे. यामुळे नैसर्गिक आपत्ती किंवा पालिकेच्या हलगर्जीमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून ५ लाख रुपयांची मदत द्यावी तसेच जखमी व्यक्तीला त्याला झालेल्या इजेनुसार नुकसान भरपाई द्यावी. याच बरोबर धोकादायक स्थितीतील झाड तोडण्याकरिता कंत्राटदारकडून उशीर झाल्यास त्याला ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येतो. या दंडाच्या रक्कमेत वाढ करून दंडाची रक्कम ५० हजार रुपये करावी अशी मागणी काते यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. काते व गंगाधरे दोघांच्याही ठरावाच्या सूचना पालिका सभागृहाने मंजूर केल्या आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages