मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत साकीनाका येथील भानु फरसाण, कमला मिल इत्यादी आगीच्या घटना ताज्या असतानाच नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या एका आठवड्यात विविध ठिकाणी ७ आगीच्या घटना घडल्या. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या वाढत्या घटनांमुळे मुंबईकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात पाच जणांचा आगीमध्ये मृत्यू झाल्याने वर्षभरात आणखी किती मृत्यू होतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात साकीनाका व कमला मिल कंपाऊंडला भीषण आगी लागल्या. दोन्ही घटनांमध्ये २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनांनी मुंबई हादरुन गेली. त्यामुळे नवे वर्ष तरी सुखाचे जाईल, या भावनेने मुंबईकर नव्या वर्षाची वाट पाहत होता. मात्र, वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात आगीच्या सात घटना घडल्या. ४ जानेवारीला अंधेरी मरोळ मधील मैमून मंझील इमारतीला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच दिवशी विलेपार्लेतील प्राईम मॉलमध्ये दुपारच्या सुमारास आग लागली. मात्र, आगीचे दाहकता मोठी नसल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवले. ५ जानेवारीला मुंबई सेंट्रलमधील जीया
अपार्टमेंटमधील बेसमेंटमध्ये आग लागली. आगीत बेसमेंटमधील सामन जळून खाक झाले. सायन प्रतिक्षानगरमधील म्हाडा कॉलनीत ही याच दिवशी आग लागली. यात चार प्लॅट पूर्णपणे जळाले. परंतु, सुदैवाने कोणतिही जिवीतहानी झाली नाही. ६ जानेवारीला म्हणजेच शनिवारी दिवसभर आगीच्या घटना घडल्या नसल्या तरी कांजूरमार्गमधील सिनेविस्टा स्टुडिओला मध्यरात्री आग लागली. आगीत उभारलेला सेट पूर्णतः जळाला. दरम्यान, १५० हून अधिक जणांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने एका २० वर्षीय तंत्रज्ञांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच लोअरपरळमधील शिवशक्ती इमारतीच्या पहिल्या मजल्याला आग लागली. सोमवारी ८ जानेवारीला सत्र न्यायालयातील तिसऱ्या मजल्याला आग लागली. सकाळच्या सुमारास ही आग लागल्याने कोणीही येथे उपस्थित नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.