मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांना आपल्या विभागातील नागरिक ओळखत नसल्याने मोक्याच्या जागेवर नगरसेवकांचे नाव व मोबाईल क्रमांक लावण्यात यावा अशी मागणी तत्कालीन नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांनी केली होती. ही सूचना पालिका आयुक्तांनी फेटाळली असली तरी याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचा नागरिकांशी थेट संबंध येतो. नगरसेवक आपल्या प्रभागातील नागरी सुविधा पुरविणे, नागरिकांच्या समस्या सोडविणे, मुंबईच्या विकासात हातभार लावणे अशा कामात अहोरात्र झटत असतात. विभागातील सर्वच नागरिक आपल्या नगरसेवकाशी परिचित नसतात. यामुळे दिल्ली, चंदिगढ, मणिपूर, तामिळनाडू महापालिकेतील क्षेत्रात त्या प्रभागातील ओळख व्हावी म्हणून नगरसेवकांचे नाव व मोबाईल नंबर दर्शवणारे लोखंडी फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. याप्रमाणे मुंबईतही नगरसेवकांचे नाव व मोबाईल नंबर लावण्यात यावेत अशी मागणी ज्योत्स्ना दिघे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती.
या ठरावाच्या सुचनेवर अभिप्राय देताना पालिकेच्या विभाग कार्यालायत सर्वच नगरसेवकांचे नाव पक्षाचे नाव प्रदर्शित केले असते. पालिकेच्या विभाग कार्यालयात सर्वच नागरिक भेट देत असतात. यामुळे त्यांना आपला नगरसेवक कोण याची या फलकावरून माहिती मिळते. मुंबईत ठीक ठिकाणी फलक लावणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरणार नसल्याचे कारण देत आयुक्तांनी दिघे यांची ठरवाची सूचना फेटाळून लावली आहे. दरम्यान आयुक्तांनी या सुचनेबाबत सर्व पक्षीय गेटनेत्यांनी निर्णय घ्यावा असेही म्हटले आहे. आयुक्तांनी दिलेला अभिप्राय विधी समितीत माहितीसाठी सादर करण्यात आला आहे. आयुक्तांच्या अभिप्रायानुसार याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत सादर केला जाणार का गटनेते या मागणीला मंजुरी देणार का याकडे आता नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.