मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत नालेसफाईवरून दरवर्षी महापालिकेववर टिका होत आली आहे. पावसापूर्वी नालेसफाई करताना पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयाचा खर्च केला जात असला तरी ठिकठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असतात. नालेसफाईची मोठी कामे पावसाळ्यापूर्वी केली जातात. त्यात बदल करून नालेसफाईची कामे दरमहिन्याला करावी अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेने केली आहे. दरमहिन्याला नाले सफाई केल्यास नाले स्वच्छ राहून पाणी तुंबणार नाही असे शिवसेनेचे म्हणणे आहे. त्यासाठी नालेसफाईच्या धोरणात बदल करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
पालिका पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के व पावसांनंतर २० टक्के नालेसाफाईची कामे करते ; मात्र काही दिवसातच साफसफाई केलेल्या नाल्यात पुन्हा कचरा, गाळ साचतो. त्याचा त्रास रहिवाशाना होतो. मुंबईतील अनेक विभागात नालेसफाईची कामे नेहमीप्रमाणे केल्यानंतरही नाल्यात कचरा व गाळ साचतो. अनेक ठिकाणी पाणी तुंबते. त्यामुळे खाजगी कंत्राटदाराकडून पुन्हा नालेसफाईचे काम करावेच लागते. यासाठी जर पालिकेच्या नालेसफाईच्या धोरणातच बदल केला व दरमहा नालेसाफाईचे काम केले तर नाले अधिक स्वच्छ राहतील व नागरिकांनाही दिलासा मिळेल, अशी मागणी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीच्या बैठकीत केली. तर महापालिकेची कामे मिळवण्यासाठी कंत्राटदार ५० टक्क्याहून कमी दर नमूद करून कामे मिळवीत आहेत. याप्रकारामुळे कामाचा दर्जा राखला जात नसून निकृष्ट दर्जाची कामी होत आहेत. त्यामुळे ५० टक्क्याहून कमी दराच्या निविदा भरून कामे मिळवणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाची गुणवत्ता दक्षता पथकाद्वारे तपासण्यात यावी अशी मागणी भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी केली आहे. नालेसफाई कंत्राटदाराकडून नीट होण्यासाठी नगरसेवकांकडून अशाप्रकारची मागणी जोर धरू लागली आहे.