मुंबई | प्रतिनिधी - मुंबई महापालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी जोरदार मोहीम हाती घेतली असताना आता प्रत्येक वॉर्डमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व विभागात अल्ट्रा मॉडर्न सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली.
मुंबईची कचरा कोंडी फोडण्यासाठी पालिकेने सोसायट्यांना कचरा व्यवस्थापन करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. यामध्ये १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणारी आस्थापने आणि २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आकाराच्या सोसायट्यांना कचऱयाचीं विल्हेवाट स्वत: लावावी लागणार आहे. यातच कचर्याच्या विल्हेवाटीसाठी उपलब्ध असलेल्या डंपिंग ग्राऊंडची क्षमताही संपत आल्याने पालिका प्रशासनाने प्रत्येक वॉर्डातील कचऱ्यावर त्या त्या विभागातच विलगीकरण आणि प्रकिया करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईत एकूण ९ हजार ५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. महापालिकेने केलेल्या उपाययोजनांनंतर कचऱ्याचे प्रमाण कमी झाले असून हे प्रमाण आता ७ हजार २०० मेट्रिक टनपर्यंत आले आहे. हे प्रमाण ५ हजार मेट्रिक टन इतके कमी करण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. विभागात सुरू होणाऱ्या अल्ट्रा मॉडर्न सेंटरमध्ये अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्या त्या विभागातील सुका आणि ओला कचरा वेगळा केल्यानंतर प्रक्रिया त्यावर प्रक्रिया केली जाईल. ओल्या कचरयापासून खत आणि सुक्या कचऱयाचीं विल्हेवाट लावण्यात येईल.