![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEirqfJJfl65Vsnd2idpmLumbuPEOh8hIqH6rtLdzgZuNw4fWzCcprxBMD4AcxWZVGVGK5aiFGapJtaC5kcKhBu0yGW_mhouQvrNlja2M-MgVkQ8QHf-j95iKLWsAw6k-3XHlqbWDfL0A8lJ/s640/Hon+CM+at+Electric+Car+Opening+PROG-3.jpg)
मुंबई - वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले असून या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय पर्यावरण, वन मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र शासन आणि टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा व इइएसएल या कंपन्यांसोबत पाच महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. पुढील काळात शासकीय वापरासाठीची तसेच महानगरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई व्हेईकलचा वापर वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यावेळी केली.
राज्य शासनाच्या वीजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई व्हेईकल) वापर करण्यासंदर्भातील धोरणाच्या अनुषंगाने आज राज्य शासनाने शासकीय कार्यालये, सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक सेवांमध्ये ई व्हेइकलचा वापर, चार्जिंग केंद्रे उभारणे आदीविषयी सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे (यूएनइपी) कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम आदी उपस्थित होते.