यावर्षीही पावसाळ्यात मुंबई तुंबणार - रवी राजा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

यावर्षीही पावसाळ्यात मुंबई तुंबणार - रवी राजा

Share This

नालेसफाईची कामे समाधानकारक नाहीत -
मुंबई । जेपीएन न्यूज टीम -
पावसाळा एक महिन्यावर आला तरी मुंबईतील नालेसफाईने अद्याप वेग घेतलेला नाही. नालेसफाईचे काम जोरात सुरु असून २५ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तर मुंबईमधील नाल्यांची सफाई समाधानकारक होत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान मुंबईतील नाल्यांची कामे समाधानकारक होत नसल्याने यावर्षीही मुंबई तुंबणार असा दावा विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेत नाले सफाई घोटाळा गाजला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नालेसफाई दरवर्षी चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यापूर्वी दोन महिने आधी नाले सफाईच्या कामाला सुरुवात होते. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत नालेसफाईचे काम केले जाते. यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असली तरी महिनाभरात म्हणावी तशी नालेसफाई झालेली नाही. याबाबत मुंबईमधील नागरसेवकांशी संपर्क साधला असता अनेक नगरसेवकांनी नालेसफाईच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

घाटकोपर येथील नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्ष रुपाली आवळे यांनी नालेसफाई समाधानकारक होत नसल्याचे संगितले आहे. छोट्या नाल्यांच्या सफाईसाठी अद्यापही कंत्राटदार मिळाले नसल्याने सफाईचे काम सुरु नसल्याचे म्हटले आहे. एनजीओची माणसे काही ठिकाणी देण्यात असली तरी त्याची संख्या कमी असल्याने नालेसफाई होणार कशी असा प्रश्न नगरसवेकांनी उपस्थित केला आहे. तसेच काही ठिकाणी गटारांच्या बाजूला टाकण्यात आलेला कचरा रस्त्यावर आठ - आठ दिवस पडून असल्याने नागरिकांचा रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

शिक्षण समिती अध्यक्ष व सायन कोळीवाडा येथील नगरसेवक मंगेश सातमकर यांनी त्यांच्या विभागात मोठ्या नाल्यांची सफाई सुरु आहे. मात्र लहान नाल्यांच्या सफाईसाठी कंत्राटदार देऊ असे वॉर्डमधून सांगण्यात आले, अद्याप कंत्राटदार देण्यात आला नाही. एनजीओचे कामगार दिले जातात मात्र त्यांच्याकडे साधने नसल्याने नालेसफाई योग्य प्रकारे होत नसल्याचे सातमकर यांनी सांगितले. मेट्रोच्या कामांमुळे मुंबईकरांना त्रास होणार असल्याची भीती खुद्द पालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई यावर्षी तुंबणार असल्याचा दावा पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. मुंबई तुंबणार नाही असे आश्वासन आयुक्तांनी मुंबईकरांना द्यावे असे आवाहन रवी राजा यांनी केले आहे.

कशी होते नालेसफाई -
या वर्षी साधारणपणे मोठ्या नाल्यांमधून ४ लाख ९४ हजार ७३९ टन एवढा गाळ काढण्याचे अंदाजित आहे. यापैकी ७० टक्के म्हणजे ३ लाख ४६ हजार ३१८ टन गाळ पावसाळयापूर्वी, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढणे अंदाजित आहे. तसेच छोट्या नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ७० टक्के म्हणजेच २ लाख २३ हजार ५७० टन, तर उर्वरित ३० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येणार आहे. मुंबईमधील गाळ शहराबाहेर टाकण्यासाठी कंत्रादाराने स्वतः डम्पिंगची व्यवस्था करून त्यावर गाळ डम्पिंगवर टाकण्याची जबाबदारी कंत्राटदारावर टाकण्यात आली आहे. यावर्षी नाले सफाईवर १५४ कोटी रुपये खर्च केला जात आहे.

मुंबई तुंबणार नाही असे आश्वासन द्यावे - 
१८ ते २० टक्केच नालेसफाई झाली आहे. पालिका नालेसफाईवर खर्च करत नसून कंत्राटदारांवर खर्च करत आहे. पाणी साचू नये म्हणून पंप लावले जातात त्यासाठी आधी १७ कोटी खर्च होत होता. आता हा खर्च ५४ कोटी पर्यंत पोहचला आहे. नालेसफाई होत नाही. पालिकेने नालेसफाई केली नाही तरी पाऊस सर्व नाल्यांची सफाई करेल. यावर्षी मेट्रोमुळे मुंबईकरांना त्रास होणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी एमएमआरडीएला पत्र दिले आहे. त्यामुळे आयुक्तांनी पाणी तुंबणार नाही असे आश्वासन मुंबईकरांना द्यावे. 
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते 

२५ टक्के नालेसफाई - 
नाले सफाई २५ टक्के झाली आहे. नाले सफाईसाठी कंत्राटदार नेमले आहेत. सफाई कामाचा लोड वाढला आहे. त्यामुळे हायवेवर गाळ नेणाऱ्या गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. वजनकाट्यांची संख्या कमी असल्याने कांदिवली येथील बालाजी काटा व पूर्व द्रुत गती मार्गावर माणकोली येथे हे दोन नवीन काटे सुरु केले जाणार आहेत. वजनकाट्यांची अडचण दूर होताच सर्व सुरळीत होईल. 
- विद्याधर खणखर, प्रमुख अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या 

अडचणी दूर करू -
नाले सफाईची कामे सुरु आहेत. काही अडचणी असल्यास त्या दूर केल्या जातील. लहान नाल्यांच्या कामांसाठी वॉर्डला कंत्राटदार दिले आहेत. 
- विनोद चिटोरे - संचालक, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages