मुंबई - केंद्र सरकारच्या प्रस्तावित राष्ट्रीय वैद्यकीय आयोग या विधेयकाला विरोध असल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या देशभरातील डॉक्टरांनी शनिवारी एक दिवसाचा संप केला. या संपादरम्यान देशभरात साडेतीन लाख तर, महाराष्ट्रात ५० हजारांहून अधिक डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवल्या. पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या तसेच संसर्गजन्य आजारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना ओपीडीच्या सुविधा मिळाल्या नाहीत. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला तसेच तापाच्या त्रासाच्या तक्रारी वाढल्याने डॉक्टरांकडे गर्दी होती. आज, रविवारी अनेक ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने शनिवारी नेहमीच डॉक्टरांकडे गर्दी होत असते. मात्र ओपीडीसुविधा नसल्याने रुग्णांना परत जावे लागले.