चेंबूर माहुलमधील रिफायनरी मुंबईबाहेर स्थलांतरित करा - संजय निरुपम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चेंबूर माहुलमधील रिफायनरी मुंबईबाहेर स्थलांतरित करा - संजय निरुपम

Share This
मुंबई - चेंबूर व माहुल परिसरामध्ये आरसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल, बीएआरसी, टाटा पॉवर हे पाच मोठे प्रकल्प सुरु आहेत. हे पाचही प्रकल्प जेव्हा निर्माण झाले होते. तेव्हा या प्रकल्पाच्या परिसरामध्ये लोकवस्ती नव्हती. मोकळ्या जागा होत्या. परंतु आता चेंबूर आणि माहुल परिसरामध्ये प्रचंड प्रमाणांत लोकवस्ती वाढलेली आहे. त्यामुळे शासनाने या पाचही प्रकल्पांचे स्थलांतर केले पाहिजे आणि स्थलांतर करून त्या परिसराला ना विकास क्षेत्र (No Development Zone) म्हणून घोषित केले पाहिजे. पॉप्युलेशन ग्रोथ ही तपासली गेली पाहिजे. शासनाने लवकरात लवकर या बाबतीत गांभीर्याने लक्ष घालून उपाय शोधला पाहिजे. नाहीतर भविष्यात खूप मोठी दुर्घटना होऊन अनेकांना प्राण गमवावे लागतील, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. 

बुधवारी (8 ऑगस्ट 2018) चेंबूरमधील बीपीसीएल प्रकल्पात दुपारी पावणे-तीन च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीच्या परिसरात आगडोंब उसळला व आगीपासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना 43 कामगार जखमी झाले. त्या कामगारांना सुश्रुषा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्या रुग्णांना भेटून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आज संजय निरुपम सुश्रुषा रुग्णालयात गेले होते. तेव्हा त्यांनी हे उद्गार काढले. 

चेंबूर व माहुल परिसरामध्ये आरसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल, बीएआरसी, टाटा पॉवर हे पाच मोठे प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांमधून कायम ज्वलनशील पदार्थ बाहेर पडून वातावरणामध्ये मिसळत असतात. त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झालेले आहे. चेंबूर हे गॅस चेंबर झालेले आहे, भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते. या पाचही प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात गॅस, वायू, केमिकल्स, धूर बाहेर पडत असल्यामुळे येथील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यावर शासनाने लवकरात लवकर उपाय शोधला पाहिजे, जेणेकरून भविष्यात मोठी दुर्घटना होणार नाही, असे उद्गार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काढले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages