मुंबई - पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व प्रकारे सज्ज आहे. त्यानुसार मॅनहोल्समध्ये पडून कोणताही अपघात होऊ नये, म्हणून पालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. त्यासाठी ८३९ मेनहोल्सवर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयास सोमवारी देण्यात आली. तर असे अपघात टाळण्यासाठी मॅनहोल्सची झाकणे उघडू नका, तशी जनजागृती मुंबईकरांमध्ये करा, असे निर्देश न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती के. के. सोनावणे यांच्या खंडपीठाने महापालिकेला दिले..
प्रभादेवी येथील रहिवासी डॉ. दीपक अमरापूरकर यांचा गेल्या वर्षी अतिवृष्टीदरम्यान मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत उघड्या मॅनहोल्सच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका फेडरेशन ऑफ रिटेल ट्ेडर्स वेल्फेअर असोसिएशनने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत न्यायमूर्ती के. के. सोनावणे यांच्या खंडपीठासमोर सोमवार सुनावणी झाली. यावेळी महापालिकेच्या वतीने ॲड. अनिल साखरे यांनी मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे ८३९ मॅनहोल्सवर लोखंडी संरक्षक जाळ्या बसवत आल्याची माहिती दिली. तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज असल्याचेही स्पष्ट त्यांनी केले. मॅनहोलमध्ये पडून अपघात घडू नये, म्हणून उघड्या मॅनहोलजवळ सावधानता बाळगण्यासाठी लाल बावटे का लावले जात नाही, असा सवाल हायकोर्टाने पालिकेला विचारला. यावेळी पालिकेने सर्व उघड्या मॅनहोल्सवर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली..