काँग्रेसबरोबर आघाडी, राष्ट्रवादीबरोबर आघाडी नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काँग्रेसबरोबर आघाडी, राष्ट्रवादीबरोबर आघाडी नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर

Share This

मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आघाडी कायम ठेवण्याच्या निर्णयापासून आम्ही मागे फिरणार नाही. काँग्रेसला ही भूमिका मान्य असल्यास उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न करू. मात्र कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणार नाही, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत. मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. मागच्या, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायला तयार नव्हती. तेव्हा राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे. संभाजी भिडे यांची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये आहे. खासदार उदयनराजे भोसले भिडे यांची बाजू मांडतात. मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसे जाणार, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसबरोबर आम्हाला युती करायची आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र काँग्रेसच्या मित्रांबरोबर नाही. एमआयएमबरोबर युती करणार. निवडणूक लढवणार. आता मागे फिरणार नाही. काँग्रेसबरोबर युतीसाठी दरवाजे उघडे आहेत. निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काँग्रेससोबत जाण्यास तयार असणार. मात्र राष्ट्रवादीसोबत जाणे आम्हाला मंजूर नाही. राष्ट्रवादी भाजपाबरोबर जाणार नाही, याची खात्री त्यांनी काँग्रेसला द्यावी. मग आम्ही बघू, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

निवडणुका जवळ येऊ लागल्याने भाजपा, आरएसएसने राम मंदिरचा मुद्दा पुन्हा तापवण्यास सुरूवात केली आहे. पण या मुद्द्यावर आता त्यांना मतं मिळणार नाही. कारण राम मंदिर उभारण्यात वा कुठलं धार्मिक स्थळ पाडण्यात लोकांना आता रस राहिलेला नाही. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना संविधानाची तत्त्वे नाही, तर गोळवलकर यांचे विचार मान्य आहेत. त्यामुळेच ते गोळवलकर यांच्या we or our nationhood defined पुस्तकात लिहिलेले विचार समाजात पसरवत आहेत. या पुस्तकात हिंदू हा राष्ट्रीय धर्म असून इतर धर्मांनी दुय्यम भूमिका स्वीकारावी. इतर धर्माच्या नागरिकांना किती दिवस या देशात ठेवावं याचा निर्णय आता हिंदूंनी घ्यावा, अशी भाषा आहे. हे विचार एकसंध समाजासाठी धोकादायक आहेत असे आंबेडकर म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages