मुंबई - दहिहंडी साजरी करण्यासाठी थर लावताना तब्बल २१९ गोविंदा जखमी झाले असून एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत दहिहंडी निमित्त सकाळपासून गोविंदा पथकांनी थर लावण्यास सुरुवात केली होती. रात्री पर्यंत हा थरार सुरु होता. न्यायालयाने ५ थरापेक्षा जास्त थर लावू नये, १४ वर्षाखालील मुलांना थरावर चढवू नये, २५ फुटांपेक्षा जास्त हंडी लावू नये असे स्पष्ट आदेश दिले असताना त्या आदेशाची पायमल्ली करत दहिहंडीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी धारावी येथील कुश खंदारे (२६) हा थरावर चढत असताना आकडी येऊन खाली पडला. त्याला जवळच्या सायन रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुंबईत रात्रीपर्यंत एकूण २१९ गोविंदा जखमी झाले असून १९५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. अद्यापही २४ जनावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.