मुंबई - मुंबईत आपत्कालीन घटना वारंवार घडतात. मागील पाच वर्षात सुमारे ४९१७९ घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत ९८७ लोकांचा बळी तर ३०६६ जण जखमी झाले होते. आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य करण्याचे काम मुंबई अग्निशमन दल करते. दलात ३८०७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्या पदांपैकी २८८० पदे भरण्यात आली असून उर्वरित ९२७ पदे रिक्त अाहेत, अशी माहिती अधिकारातून समाेर आली आहे. अग्निशमन दलातील रिक्त पदांबाबत आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहिती मागवली होती. दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार उप प्रमुख अग्निशमन अधिकारी ०१, विभागीय अग्निशमन अधिकारी ०३, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी ०३, वरिष्ठ केंद्र अधिकारी २०, केंद्र अधिकारी २६, सहाय्यक केंद्र अधिकारी ८०, सहाय्यक केंद्र अधिकारी (संदेश) ०२, दुय्यम अधिकारी ६५, प्रमुख अग्निशामक ६६, यंत्रचालक १३४, अग्निशामक ५५९, रेडिओ मैकेनिक ०८ अशी ९२७ पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. मुंबईत घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अग्निशमन दल सारख्या खात्याबाबत गंभीर असायला हवे. या खात्यातील रिक्त पदांची लवकरच भरावीस अशी मागणी पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रंहागदळे यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे शकील अहमद शेख यांनी सांगितले.