दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात विजय रिपब्लिकन, भाजपचाच - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 October 2018

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात विजय रिपब्लिकन, भाजपचाच - रामदास आठवले


मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी युती केली नाहीतर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन - भाजप युती विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी युती विरुद्ध शिवसेना असा तिरंगी सामना होऊ होईल. असा तिरंगी सामना झाला तरी भाजपच्या साथीने रिपब्लिकन पक्ष ही निवडणूक जिंकू शकतो असा आत्मविश्वास व्यक्त करून आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

चेंबूर च्या अँकर्स क्लब हॉल मध्ये दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात मार्गदर्शन करताना ना रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष सर्व तालुका अध्यक्ष; वॉर्ड अध्यक्ष तसेच प्रमुख नेते उपस्थित होते.

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातुन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी स्वतः ची उमेदवारी जाहीर केली असून हा मतदारसंघ जिंकण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारसंघाच्या तयारी साठी त्यांनी तीन मोठ्या बैठका घेतल्या आहेत. आगामी दि 27 ऑक्टोबर रोजी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भव्य मेळावा घेऊन रिपब्लिकन पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी ही बैठक चेंबूरच्या अँकर्स क्लब मध्ये घेण्यात आली.


मागील चार वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाचे लोकसभेत प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत आपण लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सन 1998 मध्ये याच मतदारसंघातून आपण लोकसभेत निवडून गेलो होतो. तसेच या मतदारसंघात चेंबूर आणि अनुशक्तीनगर हे रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले जोडले गेल्याने लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ निवडला आहे. शिवसेना भाजप रिपाइं अशी युती झाली तरी शिवसेनेला पालघर मतदारसंघ देऊन दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी घेण्यात येईल असे ना रामदास आठवले म्हणाले. शिवसेना भाजप रिपाइं युती झाली तर लोकसभेच्या दोन जागा रिपाइं लढेल तसेच शिवसेना सोबत नसेल तर रिपाइं चार जागांवर लोकसभा निवडणूक लढेल असे आठवले म्हणाले.

आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात एक तरी विधानसभा जिंकण्यासाठी तसेच प्रत्येक तालुक्यात दोन नगरसेवक निवडून आणण्याची तयारी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावी. प्रत्येक वॉर्ड सोबत प्रत्येक बूथ पर्यंत पक्षसंघटन मजबूत करावे. चांगली लोकसेवेची कामे करून पक्षाची प्रतिमा उजळ करावी. दलितांसोबत मुस्लिम समाजाचे मतदान महत्वाचे असून त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून भेटीगाठी घ्याव्यात. तसेच सोशल मीडियात पक्षाचा प्रचार करून टीकाकारांना सडेतोड उत्तरे सोशल मीडियात लिहा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात दलित मुस्लिम मतांसोबत जनरल मतदानही मला मिळू शकेल असे सांगत आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईत रिपब्लिकन पक्षाला विजय मिळू शकतो असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Post Bottom Ad