नवी दिल्ली – 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आला होता, असा दावा करून खळबळ उडवून देणारा अमेरिकन सायबर तज्ज्ञ सय्यद शुजाविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. लंडनमधील ईव्हीएम हॅकथॉनने भारताच्या राजकारणात मोठे वादळ आणले आहे.
ईव्हीएम हॅकिंग करता येते, भारतात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएममध्ये फेरफार केले. या हॅकिंगची माहिती असल्याने व बिंग फुटेल या भीतीने भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली. भाजपसोबतच अन्य काही राजकीय पक्षही ईव्हीएम हॅकिंगचा आधार घेत असतात, असा दावा करत शुजाने ईव्हीएम हॅकिंगचे प्रात्यक्षिकही दाखविले होते.
या पत्रकार परिषदेनंतर भारताच्या निवडणूक आयोगाने लगेचच पत्रक जारी करत ईव्हीएम हॅकिंगचा दावा फेटाळून लावला होता. भारतात मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आहेत. या मशीन हॅक करणे केवळ अशक्य आहे, असे आयोगाने नमूद केले होते. त्यानंतर आता पुढचे पाऊल उचलत आयोगाने शुजाविरोधात कायदेशीर कारवाई करायचे ठरविले आहे.
निवडणूक आयोगाने एक तक्रार अर्ज दिल्ली पोलिसांकडे सादर केला असून शुजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी विनंती त्यात केली आहे. ईव्हीएम डिझाइन टीमचा आपण भाग होतो आणि भारतात ज्या ईव्हीएमचा वापर होतो ते हॅक करता येेते, या शुजाच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसून त्याने पत्रकार परिषदेत जे दावे केले आहेत त्या सर्वाचीच सखोल चौकशी करण्यात यावी, अशी विनंती आयोगाने तक्रार अर्जात केली आहे.