![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRaYggVWLVn-Lsvk_gQQW98viulSVayv3j-wKpGG9A5ByqO4rKZjMkYkJvJyYpnM6Z5T_NlHwqmULtamdX0whraPSqPSoj9lstjkLen_t8wO8o2rSffEntx5POUZtET0IdmQ6a8OXzuQ5A/s640/Min+Chandrakant+Patil+koli+wada+meeting+1.jpg)
मुंबई - मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्यांचा समावेश करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार व शासनाने ठरविलेल्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.
मुंबईतील कोळीवाड्यांचा समावेश विकास आराखड्यात करण्याच्या मागणीसंदर्भात आज महसूलमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार सुनील प्रभू,आमदार सुनील शिंदे, आमदार अनिल परब, आमदार रमेश पाटील, आमदार मनिषा चौधरी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्यांचे सीमांकन व्हावे, यासाठी विविध कोळी समाजाच्या संघटनांची मागणी आहे. नगर विकास विभागाच्या यादीत असलेल्या कोळीवाड्यांचे सीमांकन करून ते महानगरपालिकेकडे पाठवावे. तसेच मत्स्य व्यवसाय विकास विभागाच्या यादीत असलेल्या पंधरा कोळीवाड्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे सीमांकन करण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी कोळीवाडे घोषित करण्याची मागणी केली आहे, तेथील सर्वेक्षणही करावे, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.