मुंबई -- कामगारांची एकजूट आणि मुंबईकर जनतेचा पाठिंबा त्यामुळे बेस्ट कामगारांचा संप निर्णायक ठरला. या दोन्ही ताकदीमुळे प्रशासनाला नमते घ्यावेच लागेल. बेस्टचे विलिनीकरण ही फक्त कामगारांची मागणी नव्हे तर जनतेची मागणी आहे . आमची मुंबई आमची बेस्ट ' हा नागरिकांचा मंच पुढील मागण्यांसाठी सतत कार्यरत राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला. आमची मुबंई , आमची बेस्ट तर्फे शुक्रवारी बेस्ट वाचवा मुंबई वाचवा या विषयावर मुंबई मराठी पत्रकार संघात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व आमची मुंबई आमची बेस्टचे संयोजक विद्याधर दाते यांनी बेस्ट वाचवणे कशी काळाची गरज आहे याबाबत आपले विचार मांडले .
कामगाराची मुख्य मागणी बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण व्हावे , हे बेस्ट आणि बेस्ट कामगार यांच्या हिताचे तर आहेच पण ते मुंबईच्या जनतेचे हित जपणारेही आहे . बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण याचाच अर्थ जनतेला योग्य ती आणि परवडणारी परिवहन सेवा महापालिकेनेच द्यावी. हीच बाब , महानगरपालिकेच्या शिक्षण , आरोग्य , पाणीपुरवठा , गटारे आणि घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रांनाही लागू पडते . या सर्व सेवा ' पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ' या गोंडस नावाखाली खाजगी संस्था , कंपन्या , कंत्राटदार यांना आतापर्यंत दिल्या गेल्या आहेत. ज्यामुळे कामगारांचेच नाही तर जनतेचेही अतोनात हाल झाले आहेत , बेस्टच्या खाजगीकरणाला यांनी ' वेट लीजिंग ' हे नवीन गोंडस नाव दिले आहे . बेस्ट समितीने पास केलेला विलीनीकरणाचा ठराव हा महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने का पुढे पाठवला नाही? असा सवालही विचारण्यात आला.
सरकारी शाळा , सरकारी इस्पितळे , पाणी , वीज या सर्व सेवा जेव्हा खाजगी मालक चालवितात तेव्हा काय होते याचा अनुभव आम्हा नागरिकांना येतोच आहे. म्हणूनच एक जागरूक नागरिक म्हणून खाजगीकरणाचा डाव हाणून पाडला पाहिजे . यामुळे या सर्व सेवा वाचविण्यासाठी कामगार आणि नागरिक यांची एकजूट ही अपरिहार्य आहे . बेस्ट अर्थसंकल्पाचे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण व्हायलाच पाहिजे, बेस्टची कार्यक्षमता वाढवून बसभाडे कमी करून लाखो प्रवाशांना बेस्टकडे परत वळवा, बेस्ट डेपोच्या जमिनी बिल्डरांना आंदण देणे बंद करा अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.