भाजप सरकारने केलेल्या कामगिरीचा नक्कीच फायदा होणार - मनोज कोटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 April 2019

भाजप सरकारने केलेल्या कामगिरीचा नक्कीच फायदा होणार - मनोज कोटक


मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आमच्या सरकारने केलेल्या कामाचा मला आगामी निवडणुकीत जरूर फायदा होईल, अशी भुमिका ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी मांडली आहे. मनसेच्या भुमिकेमुळे महायुतीच्या मतांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा करत ईशान्य मुंबई हा मतदारसंघ भाजप, शिवसेना आणि रिपाईचा बालेकिल्ला असून भाजपच्या विजयाची परंपरा यंदाही कायम राखणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

ईशान्य मुंबईतून भाजपने मनोज कोटक यांची उमेदवारी जाहिर केल्याने बिथरलेल्या विरोधकांनी त्यांच्यावरील टीकेची धार वाढवली आहे. मात्र विरोधकांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेत मा. कोटक यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. मी माझ्या नगरसेवकपदाच्या बारा वर्षांच्या काळात या परिसरात केलेली विकासकामे लोकांसमोर आहेत. तसेच ईशान्य मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी किरीट सोमय्यांनीही आपल्या कार्यकाळात खुप मेहनत घेतली आहे. याशिवाय माझ्या मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार आणि महापालिकेच्या ३८ पैकी २८ नगरसेवक भाजप - शिवसेनेचे आहेत. त्यामुळे काळजीचे काहीच कारण नसून उलट माझ्या विरोधी उमेदवाराने काळजी करण्याजोगी परिस्थिती आहे, असा टोला मा. कोटक यांनी लगावला. तसेच माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने त्यांच्या खासदारकीच्या काळात केलेले एक तरी विकासकाम दाखवून द्यावे, असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी दिले.

उमेदवारी उशिरा जाहिर झाल्याने आपल्याला तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याच्या विरोधकांच्या दाव्याबाबत विचारले असता, मा. कोटक म्हणाले की, उमेदवारी जाहिर होणे ही एक तांत्रिक बाब होती. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, मोदीजींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठीची ही निवडणुक आहे. त्यामुळे तसा प्रचार आम्ही उमेदवारी जाहिर होण्यापुर्वीपासूनच मतदारसंघात सुरू केला होता. तसेच मी माझ्या पक्षात आणि माझ्या मतदारसंघात कायमच जनसेवेसाठी कार्यरत असल्याने वेगळ्या तयारीची गरज काय? असा प्रतिसवालही त्यांनी केला.

मनसेच्या भुमिकेचा महायुतीच्या मतांवर परिणाम नाही - कोटक
मनसेने घेतलेल्या भाजप विरोधी भुमिकेमुळे महायुतीच्या मतांवर काय परिणाम होईल, असे विचारले असता मा. कोटक म्हणाले की, मनसेने काहीही भुमिका घेतली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आमच्या सरकारने केलेले काम लोकांसमोर आहे. त्यामुळे मनसेच्या भुमिकेचा महायुतीच्या मतांवर परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले.

Post Bottom Ad