![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgZJw6BfB5mDXy89VjYGSh7SOHjDg5002zlB-Zcie8gNBzh0W6fcnNPaVBOHHqxuqPOOQldVquhzf6pEf-GlsGAaWrcPIfZvUXxy3brQZ_OENW3mujGTtHwDOvv7AdK_xgG703kh8cHESE/w640-h426/kurar+zopadi+andolan.jpg)
मुंबई - मालाड येथील कुरार व्हिलेज मेट्रो रेल्वे स्थानकाला अडथळा निर्माण करणाऱ्या झोपड्यांवर शनिवारी एमएमआरडीए आणि महापालिका यांनी कारवाई केली. या कारवाई विरोधात नागरिकांनी विरोध करीत संताप व्यक्त केला. या कारवाईत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीही विरोध केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मेट्रो रेल्वे स्थानकासाठी कुरार व्हिलेज येथील झोपड्या अडथळे ठरत आहेत. त्या हटवण्यासाठी याआधी एमएमआरडीए आणि महापालिका यांनी नोटीस दिल्या होत्या. शनिवारी सकाळी पोलिसांचा फौजफाटा घेऊन येथील झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्या. या भागातील स्थलांतरासाठी आमचा पाठिंबा आहे. त्यासाठी गिरगाव पॅटर्नप्रमाणे त्यांनाही योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांनी मागणी केली होती, मात्र ही मागणी नाकारून प्रशासनाने कारवाई केली असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
गिरगाव येथे कारवाई करताना रहिवाशांना मोबदला देण्यात आला त्याप्रमाणे येथील रहिवाशांनाही मोबदला द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. योग्य मोबदला दिल्यास आम्ही जागा सोडण्यास तयार आहोत, अशी तयारीही स्थानिकांनी दर्शवली, मात्र ही मागणी एमएमआरडीएने नाकारली. पावसाळ्यात अशा प्रक्रारे झोपडपट्यांवर कारवाई करता येत नाही, असा कायदा असताना ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप रहिवाशांनी केली आहे.
पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांची आणि त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं, असे अतुल भातखळकर म्हणाले. त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री 12 वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या ताफ्याने ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिसा देऊन आज सकाळी ९ च्या आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. भर पावसात कारवाई सुरू करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराच्याबाहेर काढले. आम्ही त्याला विरोध केला. त्यामुळे आम्हाला ताब्यात घेतले, असेही भातखळकर यावेळी म्हणाले.
हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू, असा इशारा भातखळकर यांनी दिला आहे. मालाड पूर्व येथील दफ्तरी रोड कुरार हायवे, हवा हिरा महल येथील मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळीच कारवाई करण्यात आली. त्याठिकाणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट दिली. समन्वयाचा अभाव असल्याने कुरार घरांवर कारवाई करण्यात आली असून, अशा जुलमी पद्धतीने पाडकाम करणे योग्य नाही, असे दरेकर यांनी सांगितले बोरीवली पूर्व कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये धरणे प्रदर्शन करण्यात आले. सरकारच्या विरोधात नारेबाजी देखील केली. उद्धव सरकार मोगलशाही करत असल्याचा आरोप आमदार मनीषा चौधरी यांनी केला.
No comments:
Post a Comment