सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पालिकेने मागे घेतला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 October 2021

सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पालिकेने मागे घेतला



मुंबई - आश्रय योजनेतंर्गत दादर, कासारवाडी आणि प्रभादेवी येथील सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासासाठीचा प्रस्ताव अखेर प्रशासनाने मागे घेतला आहे. बुधवारी स्थायी समितीत याबाबत मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. फेटाळण्यात आलेला हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मागे घेण्याबाबत प्रशासनाने मांडला होता. दरम्यान आश्रय योजनेतील एकमेव मराठी निविदाकार बी. जी. शिर्के यांची निविदा शिवसेनेच्या राजकीय दबाबामुळे आयुक्तांनी मागे घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे मराठी - अमराठी या मुद्द्यावरून शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा जुंपणार आहे.

आश्रय योजनेतील दादर कासारवाडी आणि प्रभादेवी येथील वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्याचे प्रस्तावित होते. याबाबतचा प्रस्ताव जुलै महिन्यांत स्थायी समितीच्या मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. ३०० फुटाच्या १५९७ आणि ६०० चौरस फुटाच्या १८० सदनिका अशा १७७७ सदनिका मिळवून ९८ हजार २९ चौरस मिटर इतक्या क्षेत्रफळाचे बांधकाम अपेक्षित आहे. या कामासाठी ३९५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विविध करांसह ४७८.७८ कोटींचा हा प्रस्ताव आहे. पालिकेने व्यक्त केलेल्या कार्यालयीन अंदाजापेक्षा उणे २१.७ टक्के दराने कंत्राटदाराने काम करण्य़ाची तयारी दर्शवली होती. जुलै महिन्यात स्थायीत मंजुरीसाठी आलेल्या या प्रस्तावावर आक्षेप नोंदवल्याने हा प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला होता. त्यानंतर तीन महिन्यांनंतर हा प्रस्ताव मागे घेण्यासाठी बुधवारी स्थायी समितीत मांडलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळे सफाई कामगारांचा घरांचा प्रस्ताव रखडणार आहे.

प्रस्तावावरून मराठीचा वाद रंगणार -
आश्रय योजनेतील दादर कासारवाडी आणि प्रभादेवी येथील वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्याचे प्रस्तावित होते. एकमेव मराठी निविदाकार असलेल्या बी. जी. शिर्के यांची यासाठी आलेली निविदा शिवसेनेच्या दबाबाखाली आयुक्तांनी मागे घेतली असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना - भाजपमध्ये पुन्हा जुंपणार आहे.

भाजपचा मराठी माणसासाठीचा कळवळा खोटा-
संबंधित प्रस्ताव यापूर्वी एकमताने परत पाठवण्यात आला होता. त्यावेळी भाजपने कोणताही विरोध केला नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे. त्यामुळे भाजपचा मराठी माणसाचा कळवळा वरवरचा व खोटा आहे. या प्रस्तावात त्रूटी असल्याने मागे घेण्यात आला.
यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad