महाराष्ट्र बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्र बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद

Share This


मुंबई - उत्तर प्रदेशातील लखिमपूर खीरी येथी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला. जीवनावश्यक वस्तू वगळता व्यापा-यांनीही बंदला पाठिंबा दिल्याने दुकाने व इतर व्यवहार बंद होते. बेस्ट वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या. आठ ठिकाणी बेस्टची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. रस्त्यावर रिक्षा, टॅक्सी तुरळक प्रमाणात धावत होत्या. सरकारमधील घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बेस्ट बसेस बंद राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले.

लखिमपूर येथे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना गाडी खाली चिरडण्यात आल्याच्या घटनेचा निषेध आणि शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने सोमवारी राज्यव्यापी बंद पुकारला होता. सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली. व्यापा-यांनीही बंदला पाठिंबा दिल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मुंबईच्या डबेवाल्यांनीही महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी फुटपाथवरील फळ आणि भाजी विक्रेत्यांनाही या संपाला पाठिंबा दिला आहे. 

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने सत्ताधारी पक्षांच्या आवाहनामुळे ४ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहिर केल्याने दुकाने व इतर व्यवहार बंद होते. रस्त्यावरची वाहतूकही तुरळक सुरु होती. त्यामुळे अनेक गजबजलेली ठिकाणी शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदला पाठिंबा म्हणून आहार या हॉटेल मालक संघटनेनेही ४ वाजेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद होती. तर मुंबईच्या डबेवाल्यांनीही महाराष्ट्र बंदला पाठिंबा देऊन सेवा बंद ठेवली होती.

बंदमध्ये सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस ताकदीने उतरल्याचे चित्र होते. दादर, येथील शिवसेना भवन परिसर, वरळी, लालबाग, चेंबूर आदी ठिकाणी शिवसेना रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले. वरळी येथे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याही ठिय्या आंदोलनात सहभाही झाल्या. कार्यकर्त्य़ांनी रास्ता रोको केल्याने पोलिसांनी शिवसेना नेते व माजी मंत्री सचिन अहिरसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर राजभवन येथे काँग्रेसने मूक आंदोलन करून लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. तर हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. लखिमपूर घटनेच्या निषेधार्थ अनेक संस्था, संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला होता.

बेस्ट बसेसची तोडफोड -
महाराष्ट्र बंदमध्ये बेस्ट कामगार संघटना उतरल्याने मुंबईत बेस्ट वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बेस्टच्या धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनऑर्बिट मालाड या परिसरातील बसेसची तोडफोड करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे. एकुण सात ठिकाणी आठ बेस्ट बसेसचे नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बंदचा फटका म्हणून रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्सी तुरळक प्रमाणात धावत होत्या. लोकल प्रवासासाठी मर्यादा असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages