पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी - मुख्य निवडणूक अधिकारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 October 2021

पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी - मुख्य निवडणूक अधिकारी



मुंबई, दि. 29 : पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू झाले असून, 1 नोव्हेंबर पासून 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे. या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही आणि माध्यमांची भूमिका’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मतदार नोंदणीस पात्र तरुणांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन केले.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाविषयी देशपांडे म्हणाले की, 1 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित होणार आहे. मतदारांनी ही यादी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा ऐन मतदानाच्या दिवशी यादीत नाव सापडत नसल्याच्या मतदारांच्या तक्रारी येतात, मात्र मतदारांनी आत्ताच ही यादी तपासून आपले तपशील योग्य असल्याची खात्री केली तर पुढे अडचण येणार नाही. तसेच, 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांचे वय 18 किंवा अधिक असेल, त्या नागरिकांना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. या नागरिकांचे नाव 5 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित होणाऱ्या अंतिम यादीत समाविष्ट केले जाईल, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, राज्य निवडणूक कार्यालय करत असलेल्या कामांची दखल माध्यमे घेतात. मात्र दरम्यानच्या काळातही निवडणूक विभाग मतदान जनजागृती (स्वीप) हा उपक्रम राबवत असते. या उपक्रमात मतदार यादी, यादीचे पुनरीक्षण केले जाते या मतदार नोंदणी कार्यक्रमाला प्रसिद्धी देणे आवश्यक आहे.

या परिसंवादात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र टाइम्सचे श्रीकांत बोजेवार, नवाकाळच्या जयश्री खाडीलकर, झी चोवीस तासचे निलेश खरे, लोकमतचे निवासी संपादक विनायक पात्रुडकर, (माहिती व जनसंपर्क महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे), साम टीव्हीचे प्रसन्न जोशी, मुंबई तकचे साहिल जोशी, मराठी पत्रकार संघाचे अजय वैद्य आणि राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर हे मान्यवर उपस्थित होते.

श्रीकांत बोजेवार म्हणाले की, मतदानाच्या वेळी एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक यंत्रणेने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. माध्यमांनीही लोकशाही टिकविण्यासाठी पुढे आले पाहिजे. ईव्हीएम मशीनवर विभागनिहाय मतमोजणी दाखविली जाते. त्यामुळे त्या-त्या भागात कोणाला मतदान केले गेले याचा अंदाज येतो. यासाठी एकत्रित मतमोजणी जाहीर झाली पाहिजे. मतदानाच्या दिवशी सार्वत्रिक सुट्‌टी असते, मात्र काही नागरिक मतदान न करता बाहेर फिरायला जातात. असे होऊ नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केले.

निलेश खरे म्हणाले की, नोंदणी सोपी व्हावी, विनायक पात्रुडकर म्हणाले की, लोकशाही रुजवण्यासाठी माध्यमे आणि निवडणूक आयोग यांनी एकत्रितरीत्या प्रयत्न करायला हवेत. माध्यमांना यासंदर्भातील जबाबदारीची जाणीव असली तरी त्यांनी अधिक नेटकेपणाने यासाठी प्रयत्न करायला हवेत.

प्रसन्न जोशी म्हणाले की, दुर्गम भागात निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक आयोग करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. आज समाजमाध्यमांची वाढ अतिशय झपाट्याने होत असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा कल्पकतेने वापर करायला हवा. नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर ‘कॅच देम यंग’सारखे कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. साहिल जोशी म्हणाले की, एखादा पक्ष निवडणुकीच्या दरम्यान जाहीर केलेल्या जाहीरनाम्याची नंतर किती अंमलबजावणी करतो, याबाबतची शहानिशा निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे.

माध्यम प्रतिनिधीचे मंदार पारकर म्हणाले की, निवडणूक कार्यालयाने तालुका आणि ग्रामपातळीवर मदत घेतली पाहिजे. अजय वैद्य यांनी मतदारांना लोकशिक्षणाची अत्यंत गरज असून लोकप्रतिनिधी कोणकोणत्या कामाचा अधिकार देण्यात आला आहे, याची माहिती मतदारांना करून द्यावी, असे मत व्यक्त केले.

परिसंवादातील सर्व मान्यवरांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक पवार यांनी केले, तर स्वीप सल्लागार दिलीप शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad