निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच रिपाईची उमेदवारी - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 November 2021

निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच रिपाईची उमेदवारी - रामदास आठवले



मुंबई दि. 17 नोव्हेंबर 2021 - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देण्यात येईल. तसेच रिपब्लिकन पक्षाने एकदा उमेदवारी दिल्या नंतर कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद विसरून आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणाण्यासाठी जिद्दीने काम करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

सांताक्रूझ पूर्वेतील भीमछाया सांस्कृतिक केंद्रात मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाची मुंबई मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रमुख मार्गदर्शन करताना रामदास आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे तसेच रिपाइंचे मुंबई तील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी रामदास आठवले यांच्या मातोश्री दिवंगत हौसा आई आठवले यांच्या चौथ्या स्मृतिदिना निमित्त अदारांजली वाहण्यात आली. तसेच भीमछाया केंद्रातर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. माईसाहेब आंबेडकर सभागृहाच्या नुतनीकरणाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्व जाती धर्मियांना; तसेच गुजराती हिंदी सह सर्व भाषिक आणि सर्व प्रांतियांना रिपब्लिकन पक्ष उमेदवारी देणार आहे. जिथे भाजपचा निवडून आलेला नगरसेवक आहे ते वॉर्ड वगळून इतर वॉर्ड मधील जिंकू शकणाऱ्या 50 जागा चर्चेसाठी भजप पुढे ठेवण्यात येतील. त्यातील ज्या जागा आरपीआयला सुटतील त्या जागा ताकदीने लढवून जिंकून आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यानी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. रिपब्लिकन पक्ष हा भाजप पेक्षा जुना पक्ष आहे. 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष देशभरात पोहोचलेला पक्ष आहे. भाजप स्थापन झाला त्या वर्षी केवळ 2 खासदार भाजप कडे होते. आता भाजपचे 303 खासदार आहेत. रिपब्लिकन पक्ष भाजप पेक्षा जुना पक्ष आहे. मात्र अद्याप अपल्या पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता नाही. त्यासाठी कोणत्याही एका राज्यात रिपब्लिकन पक्षाला 6 टक्के मते मिळविणे आवश्यक आहे तसेच लोकसभा निवडणुकीत आरपीआयचे किमान 2 खासदार निवडून आणणे आवश्यक आहे . भाजप आणि शिवसेना आता यापुढे कधीही एकत्र येणार नाहीत. त्यामुळे या परिस्थितीचा रिपब्लिकन पक्षाला राजकीय लाभ घेता येईल त्यासाठी आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत युती करून रिपब्लिकन पक्षाला 6 टक्के मते मिळवून किमान 12 आमदार निवडून आणता येतील त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि आपल्या भागात लोकप्रिय समाजसेवक म्हणून आपली जनमनात नोंद करावी असे आवाहन आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाची सदस्य मोहीम यशस्वी करावी असे आवाहन यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले. यावेळी रिपाइंचे सुरेश बारशिंग; मुस्ताक बाबा; सिद्धार्थ कासारे; विवेक पवार; श्रीकांत भालेराव; साहेबराव सुरवाडे; बाळासाहेब गरुड; प्रकाश कमलाकर जाधव; सोना कांबळे; जयंती गडा; आशाताई लांडगे; अभयाताई सोनवणे; उषाताई रामळू, नैनाताई वैराट; भारती गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad