डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करून साजरा केला शेतकरी आंदोलनाचा विजय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2021

डॉ. आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करून साजरा केला शेतकरी आंदोलनाचा विजय




मुंबई - आज गुरुनानक जयंती दिनी पंतप्रधान मोदींनी शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. याचा आनंद घर बचाओ घर बनाओ आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून साजरा केला आहे.

शेतकरी विरोधी कायद्याविरोधात मागील वर्षभरापासून देशभरातील शेतकरी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर आंदोलन करीत आहेत, अखेर ते तीन कायदे मागे घेण्याची घोषणा आज पंतप्रधान मोदींनी केली. हा विजय म्हणजे देशातील अन्नदात्याचा विजय आहे. जो शेतकरी मागील वर्षभरापासून आपली शेती वाचवण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर ऊन वारा पाऊस झेलत सातत्याने टिकून राहिलेला आहे. हा विजयोत्सव भारतीय लोकशाही पद्धतीचा आहे. शांतीपूर्ण पद्धतीने केलेल्या अहिंसात्मक आंदोलनाचा आहे. शिवाय डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान या देशाच्या कारभारासाठी बहाल केले आहे त्या संविधानाचा आहे. म्हणून मुंबईत चेंबूर येथे घर बचाओ घर बनाओ आंदोलनाच्या राष्ट्रीय संयोजक मेधाताई पाटकर यांच्यासह घर बचाओ घर बनाओ आंदोलनाचे कार्यकर्ते यांनी हा विजयोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत व मिठाई वाटून साजरा केला.

जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि संयुक्त किसान मोर्चाच्या सदस्या मेधाताई पाटकर यांनी यावेळी आपले मत स्पष्ट करताना सांगितले की, हा ऐतिहासिक विजय प्रेरणा देणारा आहे. आणि नक्कीच हा शेतकरी आंदोलनाचा विजय अनेक आंदोलनांना मार्ग दाखविणारा आहे. शेतकऱ्यांनी आपल्या चिकाटीतून आणि निश्चयातून मोदी सरकारला हे कायदे मागे घेण्यास भाग पाडले. पण हा निर्णय जर मोदींनी यापूर्वी म्हणजे ६५० बळी जाण्यापूर्वी घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचले असते. आता फक्त घोषणा केलीय अजून हमीभाव मिळवणे बाकी आहे. शेतकरी आंदोलन हे संपूर्ण जगभर गाजले आणि यातून केंद्र सरकारची प्रतिमा पूर्णपणे डागाळली आहे, असे असताना जरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आजचा निर्णय हा २०२४ निवडणुकांचा मार्ग मोकळा करणारा असेल असे वक्तव्य केले, तरीही या मोदी सरकारच्या कालावधीत जनतेबरोबर झालेले व्यवहार जनता विसरणार नाही. तसेच जे सरकार लोकशाही पद्धतीने, जनतेच्या संविधानिक अधिकारांचे रक्षण करीत, लोकांसाठी लोकांच्या हिताचे कायदे व त्यांचा अंमल करेल त्याच सरकारला देश चालविण्याचा अधिकार आहे. हा विजय म्हणजे जनआंदोलनांचा विजय आहे असेही मत त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad