![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_QK6eQdUbdzCa3H70HFan0j6zU9JK2sIReeea5uHEGMb5bBfX5bKxmkeNzsOaOb88e0H2cP6SF-vIsSaitHHXm3M8TqxamxnyJaBENFyS9BFLJTXQx-d40zDyPmDtNaObkzHJaZywDFE/w640-h358/vidhan_bhavan.jpg)
मुंबई - मुंबई महापालिकेतून विधान परिषदेसाठी दोन जागा असून भाजपकडून राजहंस सिंह यांनी उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून सुनील शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. सोमवारी भाजपचे राजहंस सिंह यांनी ओल्ड कस्टम येथे उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी खासदार मनोज कोटक, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार आशिष शेलार , भाजपचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. मुंबई महापालिकेकडून दोन जागा विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आहेत. त्यात भाजपने राजहंस सिंह तर शिवसेनेने सुनील शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपल्या वरळी विधानसभा मतदारसंघाचा त्याग केला होता. त्यामुळे शिंदे यांना विधान परिषद देऊन पुनर्वसन करण्याचा शिवसेनेने प्रयत्न केला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राजहंस सिंह यांना उतरवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील व्होट बँकेमध्ये त्यांचा प्रभाव आहे. आगामी महापालिका निवडणुकीत त्यांचा उपयोग करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राजहंस सिंह यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर शिवसेनेचे सुनिल शिंदे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
येत्या २३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. २४ नोव्हेंबरला अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची मुदत २६ नोव्हेबर असून १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
No comments:
Post a Comment