पेपरफुटीचा प्रकार आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पेपरफुटीचा प्रकार आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करणार - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Share This


मुंबई - राज्यात दहावीची परीक्षा सुरू आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. बोर्डाच्या पहिल्याच पेपरमध्ये उशिरा येणा-या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याची घटना समोर आली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीप्रकरणी मोठा निर्णय घेतला. कोणत्याही शाळेत पेपर फुटीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत केली.

नगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले, त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. या पुढे ज्या शाळेत पेपरफुटीचे प्रकरण समोर येईल, त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल. तसेच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिले जाणार नाहीत. यासोबतच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी एक तास आगोदर पोहोचावे. सकाळी १०.३० चा पेपर असल्यास ९:३० वाजता तर दुपारी ३ वाजता पेपर असल्यास २ वाजता पोहोचावे. परीक्षेला उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करूनच परीक्षा केंद्रात सोडले जाणार आहे.

परीक्षेसंदर्भात गैरसमजाचे वातावरण नको -
दहावीचे विद्यार्थी हे राष्ट्राच्या आणि देशाचे भवितव्य आहेत. त्यांना निर्भीडपणे परीक्षा देण्यासाठी वातावरण निर्माण करावे. शाळा तिथे परीक्षा केंद्र दिल्याने राज्यात या वेळी दहावीच्या परीक्षेला मोठ्या प्रमाणात परीक्षा केंद्र वाढलेले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त अधिक देण्याची विनंती आम्ही केलेली आहे. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी यासाठीची माहिती घेऊन परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेदेखील वर्षा गायकवाड सभागृहात म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages