मुंबईत १० टक्के पाणी कपात - उंचावर राहणा-या नागरिकांचे होणार हाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2022

मुंबईत १० टक्के पाणी कपात - उंचावर राहणा-या नागरिकांचे होणार हाल



मुंबई - लांबलेल्या पावसामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणा-या तलावांतील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने सोमवारपासून १० टक्के पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे उंचावर राहणा-या नागरिकांचे अपु-या पाण्याविना हाल होणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ ९.१० टक्के पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा ३८ दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. मुंबईत उंचावर राहणा-या वसाहतींना आधीच कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यात आता १० टक्के पाणी कपातीमुळे येथील नागरिकांचे हाल होणार आहेत.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ ९.१० टक्के पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांसाठी पुरेल इतका आहे. जूनमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी कपातीचे संकट मुंबईकरांवर आले आहे. त्यामुळे सोमवारपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय पालिकेला घ्यावा लागला आहे. यंदा अति‌शय तुरळक असा पाऊस पाणी पुरवठा करणा-या सर्व तलाव क्षेत्रात झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या वर्षी सातही धरणात २,४१,०९४ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध होता. यंदा १ लाख ३१ हजार ७७० ( ९.१० टक्के) हा पाणीसाठा पुढील ३८ दिवस म्हणजे ४ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. तलावांत मागील वर्षापेक्षा १ लाख ९ हजार ३२४ दशलक्ष लिटर पाणी साठा कमी आहे. मुंबईत सलग तिसऱ्यांदा मॉन्सून कालावधीतील जून महिन्यात पडणारा पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे पर्यावरणीय बदलांच्या परिणामांचा अभ्यास आगामी काळात पाण्याचे नियोजनासाठी करावा लागेल, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असून पावसाने हजेरी न लावल्याने मुंबईकरांसह ठाणे, भिवंडीकरांनाही पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad