मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2022

मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट



मुंबई - लांबलेल्या पावसामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणा-या तलावांतील पाण्याने तळ गाठला आहे. तलाव क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याचा साठा कमी होत आहे. आजच्या घडीला तलावात केवळ ९.०४ टक्के पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा ३७ दिवस पुरेल इतका आहे. येत्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस कोसळला नाही तर मुंबईकरांना पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ ९.०४ टक्के पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा ३७ दिवसांचा आहे. जूनमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी कपातीचे संकट मुंबईकरांवर आले आहे. खबरदारी म्हणून पालिकेने सोमवारपासून १० टक्के पाणी कपात लागू केली आहे.

गेल्या वर्षी सातही धरणात २,४४,२४३ दशलक्ष लिटर पाणी ( १६.८८ टक्के) साठा उपलब्ध होता. यंदा १ लाख ३० हजार ८७२ ( ९.०४ टक्के) हा पाणीसाठा पुढील ३७ दिवस पुरेल इतका आहे. तलावांत मागील वर्षापेक्षा १ लाख १३ हजार ३७१ दशलक्ष लिटर पाणी साठा कमी आहे. मुंबईत सलग तिसऱ्यांदा मॉन्सून कालावधीतील जून महिन्यात पडणारा पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे पर्यावरणीय बदलांच्या परिणामांचा अभ्यास आगामी काळात पाण्याचे नियोजनासाठी करावा लागेल, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांतून दररोज ३,४६५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असून पाऊस आणखी लांबल्यास मुंबईकरांसह ठाणे, भिवंडीकरांनाही दीर्घकालीन पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad