![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_ppVfDrRfbtSsLQxIVTVHKp6pYPBEeISvtM9vzM1oPJVu3c6nZxBMoPB5l_rYzkK2peeA76hqsoq11_BuwzdXlIBv1dh5lOBPiiVnvV2iEp-jPypPfYH54Zl5JUlyEdsFW2-CrjAZemXv69vR5FCvggCi4VaD0WMgI1dSqNLj9Ho_lnGijnfOCy-9/w640-h396/vidhan%20bhavan.jpg)
मुंबई - राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच बुधवार, १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या १७ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विरोधी पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित असतील.
१७ ते २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार -
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. १७ ते २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन हे १८ जुलै रोजी होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, १७ ऑगस्टपासून सुरू होणा-या अधिवेशनासाठी विधानसभा कामकाज सल्लागार समितीवरील सदस्यांची नामनियुक्त यादी जाहीर करण्यात आली.
१७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार, दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुटी आणि दिनांक २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment